थंडीत होतीये पिकांची फुलगळ, असं करा योग्य व्यस्थापन, कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
अनेक पिकांमध्ये भरपूर फुलोरा येतो मात्र फुले टिकून न राहता गळून पडतात किंवा लहान अवस्थेतील फळे झाडावरून गळतात.
बीड : फुलगळ आणि फळगळ ही शेती उत्पादनावर थेट परिणाम करणारी गंभीर समस्या असून, अनेक शेतकऱ्यांना दरवर्षी याचा मोठा फटका बसतो. अनेक पिकांमध्ये भरपूर फुलोरा येतो मात्र फुले टिकून न राहता गळून पडतात किंवा लहान अवस्थेतील फळे झाडावरून गळतात. परिणामी अपेक्षित उत्पादन मिळत नाही आणि आर्थिक नुकसान होते. विशेषतः फळबागा, भाजीपाला आणि कडधान्य पिकांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. याबद्दलच कृषी अभ्यासक महादेव बिक्कड यांनी माहिती दिली.
या समस्येमागे पाण्याचा ताण हे प्रमुख कारण मानले जाते. पिकांना आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त पाणी दिल्यास झाडावर ताण निर्माण होतो. जमिनीत ओल कमी असल्यास किंवा पाणी साचल्यास मुळांची कार्यक्षमता घटते आणि त्याचा परिणाम फुलोरा आणि फळधारणेवर होतो. फुलोऱ्याच्या आणि फळधारणेच्या काळात पाण्याचे व्यवस्थापन चुकल्यास मोठ्या प्रमाणात फुलगळ आणि फळगळ होऊ शकते.
advertisement
अन्नद्रव्यांची कमतरताही फुल आणि फळगळीस कारणीभूत ठरते. विशेषतः बोरॉन, कॅल्शियम आणि पोटॅश यांसारख्या सूक्ष्म आणि महत्त्वाच्या अन्नद्रव्यांची उणीव असल्यास परागीभवन आणि फळधारणा नीट होत नाही. याशिवाय रासायनिक खतांचा अतिरेक केल्यास झाडांची वाढ असंतुलित होते. फुलोऱ्याच्या काळात अतिउष्ण किंवा थंड हवामान, जोरदार वारे, अवकाळी पाऊस यामुळे परागीभवन प्रक्रियेला अडथळा निर्माण होतो.
advertisement
किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव, चुकीच्या वेळी किंवा अयोग्य औषधांची फवारणी, तसेच जमिनीचा असंतुलित pH हे घटकही फुलगळ आणि फळगळ वाढवतात. सतत एकाच प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर केल्यास झाडांवर दुष्परिणाम होतो. जमिनीचा pH खूप आम्लीय किंवा क्षारीय असल्यास अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होत नाहीत, परिणामी उत्पादनावर परिणाम होतो.
या समस्येवर उपाय म्हणून संतुलित शेती व्यवस्थापन अत्यंत गरजेचे आहे. पिकाच्या अवस्थेनुसार योग्य प्रमाणात आणि वेळेवर पाणी द्यावे. माती परीक्षण करून शिफारशीनुसार खतांचा वापर करावा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समावेश करावा. फुलोऱ्याच्या काळात हवामानाचा अंदाज घेऊनच फवारणी करावी. किडी-रोगांचे वेळेवर नियंत्रण, सेंद्रिय खतांचा वापर, जमिनीचा pH संतुलित ठेवणे आणि योग्य अंतरावर लागवड केल्यास फुलगळ आणि फळगळ कमी होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 8:19 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
थंडीत होतीये पिकांची फुलगळ, असं करा योग्य व्यस्थापन, कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला









