अमरावती : सध्याचा घडीला अनेक उच्चशिक्षित तरुण शेतीकडे वळत आहेत. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून लाखोंची कमाई करत आहेत. अश्याच एका तरुणाची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अमरावतीमधील या उच्चशिक्षित तरुणाचे नाव मयूर देशमुख असून तो संत्रा शेतीमधून एकरी 2 लाखांचे उत्पन्न मिळवत आहे.
अमरावतीमधील चांदूर बाजार तालुक्यात वसलेलं छोटंसं गाव काजळी. या गावातील तरुण उच्चशिक्षित शेतकरी मयूर प्रवीण देशमुख शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहे. त्यामुळे तो इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरला आहे. संत्रा, कपाशी, अद्रक, हरभरा या सर्व पिकाची लागवड तो नवीन पद्धतीने करतो. त्याचे योग्य व्यवस्थापन करतो. त्याने आता शास्त्रज्ञ रेमॅन निवे यांच्या मार्गदर्शनाखाली संत्रा शेतीची बाग तयार केली आहे. त्यातून त्याला चांगले उत्पन्न मिळत आहे. त्याचबरोबर संत्रा कटिंग बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा तो करतो. उच्च शिक्षण घेतल्यानंतर तरुणांची धाव ही नोकरीकडे असते. पण, मयूर याने शेतात नवनवीन प्रयोग करून शेती हाच व्यवसाय पुढे नेला.
advertisement
मयूर देशमुख याच्याशी लोकल 18 च्या प्रतिनिधीने चर्चा केली असता तो सांगतात की, माझं शिक्षण एम. डीएड झालेले आहे. आमच्याकडे वडिलोपार्जित 32 एकर शेती होती. त्यातील आता आमच्याकडे 15 एकर शेती आहे. बाकी काकांकडे आहे. मयूर याला शेतीची आवड आधीच होती पण, त्यांचे काका छोटू देशमुख यांच्यामुळे ही आवड वाढत गेली. त्यामुळे उच्चशिक्षित असूनही त्याने शेती हा पर्याय निवडला.
मयूर याने आता शेतात संत्रा, तूर, हरभरा, अद्रक याची लागवड केली आहे. सर्वच शेती ते नवनवीन पद्धतीने करतात. 10 एकर मधील संत्रा शेती त्याने शास्त्रज्ञ रेमॅन निवे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. त्यातून त्याला एकरी 2 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्याचबरोबर त्याने संत्रा कटिंग बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे सुद्धा सुरू केले आहे.
संत्रा शेतीमधून जर अधिक उत्पन्न घ्यायचे असेल तर सर्वात आधी रासायनिक खते आणि इतर गोष्टी वापरणे आपल्याला टाळावे लागेल. सेंद्रिय शेतीवर भर दिला तर नक्कीच यातून उत्पन्न जास्त मिळू शकते. वेळेवर संत्राला फवारणी, खत, पाणी आणि इतर सोई देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर योग्य प्रमाणात सुद्धा देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तणनाशक हे कमीत कमी वापरावे.
शेतीकडे जर व्यवसायिक दृष्टिकोनातून बघितले तर शेती ही फायद्याची ठरते. सद्यस्थितीमध्ये अनेक लोकांची संत्रा बाग ही विस्कळीत झाली आहे. त्यातून उत्पन्न सुद्धा खूप कमी मिळाले आहे. याचे कारण आहे, चुकीचे व्यवस्थापन. संत्रा पिकाचे व्यवस्थापन जर व्यवस्थित केले तर संत्रा मधून भरघोस उत्पन्न घेता येते, असे मयूर सांगतो.