आर्थिक मदत वाटपास सुरुवात
सप्टेंबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यात सीना आणि भीमा नद्यांना आलेल्या पूरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. जिल्ह्यातील एकूण ८० महसूल मंडळांमध्ये ७ लाख ६४ हजार १७३ शेतकरी बाधित झाले आहेत. या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य शासनाने ८६७ कोटी ३३ लाख ६३ हजार ८५५ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा मदत निधी शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून, अनेकांना रकमेचा लाभ मिळायला प्रारंभ झाला आहे.
advertisement
ई केवायसी अनिवार्य
तथापि, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांवर अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. दिवाळीनंतर चार दिवस उलटूनही काही शेतकऱ्यांना मदत निधी मिळालेला नाही. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे आणि अॅग्रीस्टॉक योजनेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांना ई-केवायसी करण्याची गरज नाही. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॉक क्रमांक नाही किंवा फार्मर आयडी तयार केलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, अशी सूचना कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “फार्मर आयडी ही शेतकऱ्यांसाठी एकसंध ओळख प्रणाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय योजनांमध्ये पारदर्शकता वाढेल आणि मदत थेट त्यांच्या खात्यात जमा होईल. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे सर्व्हर बंद पडतो आहे, तो प्रश्न लवकरच सोडवला जाईल.”
सध्या महसूल आणि कृषी यंत्रणा शेतकऱ्यांचे ई-केवायसी काम जलदगतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. काही ठिकाणी ग्रामपंचायती आणि कृषी सहाय्यक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
एकूणच, अतिवृष्टी आणि पूरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी अॅग्रीस्टॉक आणि फार्मर आयडी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
