मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारे शेतकरी, गरजू नागरिक आणि समाजातील इतर घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहेत. लाखो लाभार्थी या योजनांशी जोडले गेले असून, त्यांचा फायदा घेत आहेत. यात अनुदानापासून थेट आर्थिक सहाय्यापर्यंत अनेक योजना समाविष्ट आहेत. शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan) होय.
advertisement
शेतकऱ्यांसाठी थेट आर्थिक मदत
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून ६,००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. ही रक्कम प्रत्येकी २,००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाते. आतापर्यंत केंद्र सरकारने या योजनेचे २० हप्ते वितरित केले आहेत. सर्वात अलीकडचा, म्हणजे २० वा हप्ता २ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला.
२१ वा हप्ता किती आणि कधी?
आता शेतकऱ्यांना २१व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. या हप्त्यातही नेहमीप्रमाणे २,००० रुपयांचीच रक्कम मिळेल. पीएम किसान योजनेचे हप्ते साधारणपणे चार महिन्यांच्या अंतराने वितरित केले जातात. या नियमानुसार २१ वा हप्ता नोव्हेंबरमध्ये, म्हणजेच दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र केंद्र सरकारकडून याबाबतची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्राधान्य?
दरम्यान, जम्मूपासून महाराष्ट्र आणि पंजाबपर्यंत झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके वाहून गेली, जमिनी तुडुंब भरल्या, आणि शेतकऱ्यांवर खर्चाचा डोंगर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अंदाज वर्तवला जात आहे की, केंद्र सरकार या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यातच २१वा हप्ता सर्वात आधी जमा करू शकते.
योजनेचा लाभ कसा घ्यावा?
शेतकऱ्यांचे नाव पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर नोंदलेले असणे आवश्यक आहे.
आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेले असणे बंधनकारक आहे. राज्यातील महसूल व कृषी विभागाकडून पात्रतेची पडताळणी केल्यानंतरच लाभ दिला जातो.
शेतकऱ्यांसाठी सूचना
सरकारकडून हप्ता मिळेपर्यंत शेतकऱ्यांनी फसवणूक करणाऱ्या बनावट संदेशांपासून सावध राहणे आवश्यक आहे. पीएम किसान योजनेशी संबंधित कोणतेही अधिकृत अपडेट्स केवळ pmkisan.gov.in या संकेतस्थळावरच पाहावेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता नोव्हेंबरमध्ये जारी होण्याची शक्यता आहे. या हप्त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा मिळणार आहे. पावसामुळे ज्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात प्रथम पैसे जमा होतील अशीही शक्यता वर्तवली जात आहे. शेतकरी वर्गासाठी ही रक्कम फार मोठी नसली तरी त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी आणि सणासुदीच्या काळात मोठा दिलासा ठरणार आहे.