पुणे : भारतातील आघाडीची ट्रॅक्टर उत्पादक व निर्यातदार कंपनी सोनालिका ट्रॅक्टर्सने ‘किसान पुणे 2025’ या प्रतिष्ठित कृषी प्रदर्शनात कंपनीने एकूण आठ नवीन ट्रॅक्टर मॉडेल्स सादर केले. यामध्ये सोनालिका चित्ता डीआय 32, सिकंदर डीएलएक्स डीआय 60 टॉर्क प्लस आणि सीएनजी तंत्रज्ञानावर आधारित सोनालिका सीएनजी ट्रॅक्टर ही मॉडेल्स विशेष आकर्षण ठरली आहेत.
advertisement
खासियत काय?
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही सर्व ट्रॅक्टर मॉडेल्स विशेषतः महाराष्ट्रातील मातीचा प्रकार, हवामान आणि शेती पद्धती लक्षात घेऊन विकसित करण्यात आली आहेत. ऊस शेती, फळबागा, भाजीपाला उत्पादन तसेच कोरडवाहू शेतीसाठी या ट्रॅक्टरची रचना करण्यात आली असून, कमी खर्चात अधिक उत्पादन मिळावे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. आधुनिक शेतीतील वाढत्या गरजा लक्षात घेऊन ट्रॅक्टरमध्ये अधिक शक्तिशाली इंजिन, उत्तम ट्रान्समिशन आणि शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे.
सोनालिकाचे सर्व नवीन ट्रॅक्टर अत्याधुनिक रोबोटिक्स आणि ऑटोमेशन असलेल्या जागतिक दर्जाच्या उत्पादन प्रकल्पात तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे गुणवत्तेत सातत्य राखले जाते, तसेच ट्रॅक्टरची टिकाऊपणा आणि कार्यक्षमता वाढते, असा दावा कंपनीने केला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेतीतील खर्च कमी करणे आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे हे सोनालिकाचे प्रमुख ध्येय असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले.
नवीन मॉडेल्स कोणते?
या प्रदर्शनात सोनालिकाने विविध क्षमतेचे आणि गरजेनुसार तयार केलेले इतर ट्रॅक्टरही सादर केले आहेत. यामध्ये टायगर डीआय 47 फोर-व्हील ड्राइव्ह (4डब्ल्यूडी), टायगर डीआय वि 26, टायगर डीआय 65, डीआय 745 तसेच सिकंदर डीएलएक्स 745 आयआयआय फोर-व्हील ड्राइव्ह (4डब्ल्यूडी) या मॉडेल्सचा समावेश आहे. ही सर्व मॉडेल्स वेगवेगळ्या शेती कामांसाठी उपयुक्त असून, अवजड मशागत, नांगरणी, पेरणी आणि वाहतुकीसाठी अधिक सक्षम आहेत.
विशेषतः सोनालिका सीएनजी ट्रॅक्टरने शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सीएनजी किंवा सीबीजी (कंप्रेस्ड बायोगॅस) तंत्रज्ञानावर आधारित हे ट्रॅक्टर पारंपरिक डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत कमी खर्चिक आणि अधिक पर्यावरणपूरक आहेत. यामुळे इंधन खर्चात लक्षणीय बचत होते, तसेच कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होते. भविष्यात स्वच्छ ऊर्जेवर आधारित शेती यंत्रसामग्रीकडे वाटचाल करण्याचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
