गौरी आवाहन कधी? शुभ मुहूर्त -
2025 मध्ये गौरी आवाहन 31 ऑगस्ट 2025 रोजी रविवारी होईल. 1 सप्टेंबरला (सोमवार) ज्येष्ठा गौरी पूजेचा शुभ मुहूर्त पहाटे 5.59 ते संध्याकाळी 6.43 वाजेपर्यंत आहे. ज्येष्ठा गौरी विसर्जन 2 सप्टेंबर 2025 रोजी होईल.
गौरींचे मुखवटे किंवा मूर्ती घरी आणताना ताट, चमचा किंवा घंटा वाजवून त्यांचे स्वागत केले जाते. त्यांना घरात आणताना ये गं लक्ष्मी, बस गं लक्ष्मी असे म्हणण्याची प्रथा आहे. गौरींना घरात आणल्यावर त्यांना घरातील सर्व समृद्धीच्या जागा (उदा. धान्य साठवण्याचे कोठार) दाखवल्या जातात. त्यानंतर त्यांची पाटावर किंवा चौरंगावर विधिवत स्थापना केली जाते.
advertisement
गौरी आगमनाच्या दुसऱ्या दिवशी, ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे विशेष पूजन केले जाते. गौरींना साडी, बांगड्या, दागिने आणि फुलांनी सजवले जाते. अनेक ठिकाणी हळद-कुंकू, बांगड्या, फणी, कंगवा असे सौभाग्याचे अलंकार त्यांना अर्पण केले जातात. या दिवशी गौरींना विविध प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. यात विशेषतः १६ भाज्या, १६ प्रकारच्या पानांची भाजी, पुरणपोळी आणि वडे यांचा समावेश असतो. हा नैवेद्य तयार करून तो गौरीला अर्पण केला जातो. गौरींची षोडशोपचार पूजा केली जाते, ज्यात गंध, अक्षता, फुले अर्पण करणे, धूप-दीप दाखवणे आणि आरती करणे यांचा समावेश असतो. यानंतर हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करून महिलांना प्रसाद वाटला जातो.
परिवर्तिनी एकादशीला श्रीहरी कूस बदलणार! या प्रकारे पूजा केल्यानं मिळतो लाभ
गौरी पूजनाला धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. गौरी हे साक्षात देवी पार्वती आणि महाशक्तीचे रूप मानले जाते. या पूजनामुळे घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येते अशी धार्मिक श्रद्धा आहे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी हे व्रत करतात. या व्रतामुळे घरात आनंद आणि सौहार्द टिकून राहतो असे मानले जाते.
भाद्रपद महिन्यात शेतात पिक तयार होत असते. त्यामुळे गौरीला लक्ष्मी (धन-धान्याची देवी) स्वरूप मानून कृतज्ञता व्यक्त केली जाते. या सणामुळे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात. माहेरवाशिणी माहेरी येतात, ज्यामुळे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते.
गौरी विसर्जन - पूजेच्या तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन केले जाते. या दिवशी गौरींना नैवेद्य दाखवून त्यांचा निरोप घेतला जातो. विसर्जन करताना 'पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणून त्यांना निरोप दिला जातो.
फोनवरून फक्त आश्वासनंच मिळतात? तुमच्या मोबाईल नंबरचा शेवटचा अंक हा असेल
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
