पुणे : वकील व्हायचं असेल तर नेमकं काय करावं, कोणती परीक्षा द्यावी हे अनेकजणांना माहित नसतं. अगदी सुरुवातीपासून जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्य सीईटी सेलकडून वकिलीच्या म्हणजेच कायद्याच्या अभ्यासक्रमाची प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात येते.
पात्रता काय?
दरवर्षी हजारो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात. त्या सर्वांनाच यश मिळतं असं नाही. परंतु जे विद्यार्थी यशस्वी होतात त्यांना इयत्ता बारावीनंतर 5 वर्षे आणि पदवीनंतर 3 वर्षे कायद्याचं शिक्षण घ्यावं लागतं.
advertisement
5 वर्षांच्या अभ्यासक्रमाची तयारी कशी करावी?
व्ही. एन. पाटील विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील प्राचार्या डॉ. नीतल नांदेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या विद्यार्थ्यांना 5 वर्षांच्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचाय त्यांना प्रवेश परीक्षेसाठी एकूण 5 विषयांचा अभ्यास करावा लागतो. त्यात भारतीय कायद्याचं ज्ञान, गणित, सर्वसाधारण इंग्लिश व्याकरण, सामान्य ज्ञान, सामान्य योग्यता अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. हा पेपर 150 गुणांचा असतो. त्यात 40 गुण कायद्यावर आधारीत प्रश्नांना असतात, तर बाकीचे गुण इतर प्रश्नांना असतात.
3 वर्षांच्या अभ्यासक्रमाची तयारी कशी करावी?
प्राचार्या डॉ. नितल नांदेडकर यांनी सांगितलं की, 3 वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षेत 30 गुणांसाठी भारतीय कायद्याचं ज्ञान विचारलं जातं. मानवाधिकार विषयाबाबतही प्रश्न विचारतात. तसंच सामान्य ज्ञान आणि इंग्रजी व्याकरण हे विषयही असतात. तर, गणित विषय नसतो.
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र विना अनुदानित खासगी व्यवसायिक शैक्षणिक संस्था, अधिनियम, 2015च्या कलम 10 नुसार सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाची स्थापना केली आहे. सीईटी सेल राज्यातील व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विविध प्रवेश परीक्षा घेत असते. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, कृषी, कायदा, वैद्यकीय, आयुष आणि ललित कला यासारख्या व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुलभ करणं हा यामागील प्राथमिक उद्देश आहे. एलएलबी, तसंच वरील सर्व प्रकारच्या प्रवेश पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी सीईटी सेलने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे.





