नेमकं घडलं काय?
12 फेब्रुवारी रोजी सतीश मुंडे हे काही मित्रांसह स्विफ्ट डिझायर कारने कला केंद्रावर गेले होते. मार्गात साळेगाव, कळंब आणि येरमाळा परिसरातील बार व धाब्यांवर थांबत त्यांनी मद्यपान केल्याचे सांगितले जाते. मध्यरात्री कार्यक्रम आटोपून गावाकडे परत येताना जुन्या वादातून काही परिचितांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर सतीश यांना छातीत व पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
advertisement
पत्नी हरवल्याची तक्रार महागात, ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशीच पतीचं कांड समोर, बीडला काय घडलं?
बेशुद्ध असल्याचं सांगितलं
घटनेनंतर सतीश यांना त्याच कारमधून साळेगाव येथे त्यांच्या घरी आणण्यात आले. ते अत्याधिक मद्यप्राशनामुळे बेशुद्ध पडल्याचे सांगण्यात आले; मात्र कुटुंबीयांनी आवाज दिला असता प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना तत्काळ केज उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलीस तपास सुरू
या प्रकरणी मयताचे वडील भागवत मुंडे यांच्या फिर्यादीवरून शेख अजमोद्दीन उर्फ मुन्ना शेख जिलानी, शेख शकील रौफ, संजय गित्ते, दत्ता तोड आदींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार खुनाचा गुन्हा येरमाळा पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. आणखी काही संशयितांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून सीसीटीव्ही फुटेज व अन्य पुरावे ताब्यात घेण्यात आले आहेत.
पतीला फोन करत राहिल्या पण...
दरम्यान, सतीश यांच्या पत्नी दीपाली या रात्री उशिरापर्यंत पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होत्या; मात्र प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती. जुन्या वादातून ही मारहाण झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. काही दिवसांपूर्वी कला केंद्राशी संबंधित आणखी एका घटनेनंतर हे ठिकाण पुन्हा चर्चेत आले असून, या घटनेमुळे केज व धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिस तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






