वेगवेगळी आमिषे दाखवून लोकांची ऑनलाईन फसवणूक केली जात आहे. बीडमध्ये अनेक जण कमी कालावधीत जास्त नफा मिळविण्याच्या मोहात पैसे गुंतवत आहेत. ऑनलाईन लिंक्स, बनावट वेबसाईट्स आणि फसव्या गुंतवणूक योजनांमुळे सामान्य नागरिक मोठ्या संख्येने बळी पडत आहेत. बीडमध्ये डॉक्टर, अभियंते, शिक्षक, पोलिस आणि बँक अधिकारीही या भामट्यांच्या जाळ्यात सापडले आहेत.
चौकीदारच निघाला चोर! रातोरात फोडली 14 दुकानं, ठाणे आणि मुंबईतील धक्कादायक घटना
advertisement
1 कोटी 60 लाख गोठवले
सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून 87 लाख 29 हजार रुपयांची रक्कम परत मिळवली. तर 1 कोटी 61 लाख 25 हजार रुपये गोठवले आहेत. ही गोठवलेली रक्कम न्यायालयाच्या आदेशानंतर मूळ खातेदारांना परत मिळण्याची शक्यता आहे. मात्र एकूण गेलेल्या रकमेच्या तुलनेत परत मिळवलेल्या रकमेचा आकडा खूपच कमी आहे. त्यामुळे सायबर पोलिसांवर अधिक गतीने तपास करण्याची जबाबदारी आहे. फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्ह्यातील सायबर पोलिस ठाण्यात तक्रारींचा ओघ वाढला आहे.
सायबर गुन्ह्यांचे बळी
सायबर गुन्हेगार कमी कालावधीत जादा उत्पन्नाचे आमिष दाखवून लोकांना ऑनलाईन गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करतात. अनेक प्रकरणांमध्ये लोकांनी घरातील दागिने विकून किंवा कर्ज काढून सायबर भामट्यांना पैसे पाठवले आहेत. आष्टी तालुक्यातील एका महिलेने अशाच फसवणुकीला बळी पडून घरातील आणि अंगावरील दागिने विकून भामट्याला पैसे पाठवले. या प्रकारानंतर तिने तक्रार दाखल केली असली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने अशा फसवणुकीचे परिणाम गंभीर होत आहेत.
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले
बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 90 गुन्हे दाखल झाले असून, 1075 अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील फसवणुकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलिसांना मोठ्या प्रमाणावर कार्यवाही करावी लागणार आहे. सायबर पोलिसांनी नागरिकांना वारंवार सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असले तरी अजूनही अनेक जण फसत असल्याचे चित्र आहे. इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही अनोळखी वेबसाईट, लिंक किंवा मेसेजवर क्लिक करू नये आणि संशयास्पद कॉल्सना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.