विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव : कामावरून घरी जाणाऱ्या 30 वर्षीय तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शहरातील रामानंद घाट परिसरात ही दुर्देवी घटना घडली. मालवाहू वाहनाने दिलेली धडक इतकी भीषण होती की दुचाकीवर असलेला तरुण 40-50 फूट फरफटत गेला.
advertisement
शहरातील रामानंद घाट परिसरात संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात नवजीवन कॉलनीतील स्वप्निल अशोक कापुरे (वय ३०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अन्य तिघे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यापैकी एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, कापुरे हे कामावरून दुचाकीने घरी परतत असताना विनाक्रमांकाच्या भरधाव मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेनंतर वाहनावरील नियंत्रण सुटले आणि चालकाने एकामागून एक अशा चार दुचाकींना धडक दिली. या भीषण अपघातानंतर वाहन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात घुसले.
या अपघातात स्वप्निल कापुरे यांना 40 ते 50 फुटांपर्यंत फरफटत नेण्यात आले. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. घटनेत जखमी झालेल्या अन्य तिघांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
दरम्यान, अपघाताची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी संबंधित वाहनाचा शोध सुरू केला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिकांनी वाहतुकीतील बेफिकिरीवर संताप व्यक्त केला आहे.
मैत्रिणीची छेड काढल्याचा संशय, अल्पवयीन पोराने 45 वर्षांच्या भिकाऱ्याला ठेचलं...
नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मैत्रिणीची छेड काढल्याच्या संशयातून एका विधी संघर्षित मुलाने एका भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. भिकाऱ्याची हत्या केल्यानंतर हा मुलगा मृतदेहाजवळ हातवारे करून नाचत होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक नाका परिसरात दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. एका अल्पवयीन मुलाने हे कृत्य केलं आहे. मृताचं वय ४५ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.