मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कवडे हा 24 वर्षीय तरुण कल्याणमध्ये कलिंगड विक्रीचा व्यवसाय करतो. कलिंगडाचे पैसे मागितले म्हणून त्याच्यासह त्याच्या सहकाऱ्यावर कोयता गँगनं हल्ला केला. हल्ल्यात दोघं गंभीर जखमी झाले. त्यांना शास्त्रीनगर रुग्णालयातून कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं.
कलिंगड विक्रेत्यानं पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तो मूळ धाराशिवचा रहिवासी आहे. उपजीविकेसाठी हसन शेख आणि हुसेन शेख यांच्या सहकाऱ्यानं कल्याण पूर्वेतील आडिवली ढोकळी भागातल्या विजय पाटीलनगर इथं भाजीपाला, कलिंगड विक्रीचा व्यवसाय करतो. त्यानं नाशिकहून कलिंगड मागवले होते. शनिवारी रात्री 11 वाजता त्यांच्या दुकानाजवळ कलिंगडाचं ट्रक आलं. हसन, हुसेन आणि अक्षयनं स्वत: ट्रकमधून कलिंगड उतरवले. त्याचवेळी तिथं रवी रेड्डी, अविनाश झा, मनीष चव्हाण आले.
advertisement
रवी रेड्डीनं कलिंगडाच्या ढिगातील 2 कलिंगडं काढून घेतली. अक्षयनं त्याच्याकडे कलिंगडांचे पैसे मागितले. त्यावर 'आपण या भागाचे भाई आहोत, माझ्याकडे कसले पैसे मागतोस', असं बोलून त्यानं अक्षयला शिवीगाळ केली. एवढंच नाही, तर रवी रेड्डीनं थेट त्याच्या दुचाकीतून कोयताच बाहेर काढला. कोयता हवेत फिरवत 'कुणी मध्ये पडलं तर मारून टाकीन', अशी धमकी दिली आणि रवी रेड्डीनं अक्षयसह त्याच्या साथीदारावर कोयत्यानं हल्ला केला. हे पाहून रस्त्यावरील लोक आपापला जीव मुठीत धरून सैरवैर पळाली. तर, समीर रेड्डीच्या 2 साथीदारांनी अक्षय आणि हुसेनला पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कसेबसे दोघं गुंडांच्या तावडीतून सुटून मानपाडा पोलीस ठाण्यात पोहोचले.
कलिंगड विक्रेत्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी या कोयता गँगवर गुन्हा दाखल केला आहे. समीर उर्फ रवी रेड्डी, मनीष चव्हाण, अविनाश झा अशी आरोपींची नावं आहेत. त्यांची कल्याण पूर्व आडिवली, ढोकळी भागात दहशत आहे. ते इथल्या हातगाडी, फेरीवाले, विक्रेत्यांकडून हप्ते घेतात, असं तक्रारदार अक्षय कवडे यानं तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, या तिघांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.