नेमकं घडलं काय?
6 फेब्रुवारी रोजी लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुखेड गावात एका शेतविहिरीत अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मृतदेहाची ओळख पटवणे आणि आरोपी शोधणे हे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा योग्यरित्या ठरवली.
advertisement
Pune : घराचा उंबरठा ओलांडला तो शेवटचाच, कुटुंबाचा लाडका सिद्धार्थ हरपला; परिसरात हळहळ
तपासादरम्यान पोलिस पुण्यातील एका संशयित कारपर्यंत पोहोचले. पुढील चौकशीत रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत असणाऱ्या बंडू भिसे याच्यावर संशय निर्माण झाला. त्यानेच आपल्या मित्रांच्या मदतीने हत्या केल्याचे उघड झाले. भिसे हा कळंबोलीतील रोडपाली परिसरात वास्तव्यास होता.
पोलीस हवालदार बंडू भिसे याची सोमनाथ बोबडे याच्याशी मैत्री होती, मात्र सोमनाथचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय भिसे याला होता. या संशयातूनच भिसे याने विजय पवार, किरण गायकवाड आणि श्रीनिवास लोणे या तिघांच्या मदतीने 5 फेब्रुवारी रोजी सोमनाथला भेटीसाठी बोलावले. त्यानंतर त्याचा तोंड दाबून निर्घृण खून करण्यात आला. हत्या केल्यानंतर मृतदेह कारच्या पुढील सीटवर ठेवून भिसे याने तब्बल 191 किलोमीटरचा प्रवास करत तो सुखेड गावातील शेतविहिरीत टाकला.
अटक झाल्यानंतरही बंडू भिसे याने गुन्ह्याची कबुली देण्यास नकार दिला. मात्र लोणंद पोलिसांनी त्याच्या साथीदारांना विश्वासात घेत सखोल चौकशी केली असता संपूर्ण घटनाक्रम उघडकीस आला. सहायक निरीक्षक शिवाजी जायपात्रे, उपनिरीक्षक रोहित हेगडे यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामुळे पोलिस दलातील व्यक्तीच गुन्हेगार ठरल्याने मोठी खळबळ उडाली आहे.






