सोनमने केले 119 वेळा फोन कॉल्स...
सोनम रघुवंशी ही आणखी एक संशयित संजय वर्मा याच्यासोबत अनेक वेळ बोलत असे. 1 मार्च ते 25 मार्च दरम्यान सोनमने संजय वर्माला 119 वेळा फोन केला होता. आता संजय वर्मा कोण आहे आणि राजा रघुवंशी प्रकरणात त्याची काय भूमिका आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 23 मे रोजी राजा रघुवंशी यांची शिलाँग येथे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी सोनमसह आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे.
advertisement
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात शिलाँग पोलीस गंभीरतेने तपास करत असून, तपासाचा प्रत्येक मुद्दा जोडून सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. याच अनुषंगाने मंगळवारी पोलिसांच्या एका पथकाने इंदूर येथील राजा रघुवंशीच्या घरी भेट दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी राजाच्या कुटुंबीयांशी बोलून सोनमचे वर्तन आणि लग्नानंतर तिने इंदूरमध्ये घालवलेल्या दिवसांची माहिती घेतली. पोलीस पथकातील तीन अधिकाऱ्यांनी राजा रघुवंशीचा भाऊ विपिन रघुवंशी आणि त्यांच्या आईचीही चौकशी केली.
राजाच्या कुटुंबीयांची पोलिसांनी केली चौकशी...
विपिनने चौकशीनंतर सांगितले की, "तीन अधिकारी आमच्या घरी आले होते. त्यांनी आमच्याकडे फक्त सोनम लग्नानंतर चार दिवस आमच्या घरी राहिली असताना तिचे वर्तन कसे होते आणि तिने घरातील सदस्यांशी कसा संवाद साधला, याची माहिती घेतली." विपिन पुढे म्हणाले की, "मी अधिकाऱ्यांना सांगितले की, आम्ही सोनमचे दीर असल्याने आम्ही कधीही थेट तिच्यासमोर जात नव्हतो किंवा तिच्याशी बोलत नव्हतो. मी त्यांना सांगितले की, आम्ही सोनमला फारसे पाहिलेच नाही, त्यामुळे तिचे वर्तन कसे होते, याबद्दल जास्त काही सांगू शकत नसल्याचे म्हटले. या चौकशीदरम्यान पोलिसांनी राजा रघुवंशीच्या आईचीही चौकशी केली आणि सोनमच्या उपस्थितीत घरात काही असामान्य घडामोडी किंवा तणाव होता का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
2 जून रोजी सोनमचा पती राजा रघुवंशी याचा मृतदेह मेघालयमधील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा येथील रियात अर्लियांगमधील वेई सवाडोंग पार्किंगच्या खाली असलेल्या दरीत आढळला होता.
पतीचा मृतदेह सापडल्यानंतर काही दिवसांनी, सोनमने 7 जून रोजी उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यानंतर तिला रस्त्याने पटनाला, मग कोलकाता आणि गुवाहाटीला नेण्यात आले. गुवाहाटी विमानतळावरून तिला शिलाँग येथील सदर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. बाकीच्या चार आरोपींनाही शिलाँगला आणण्यात आले. 11 जून रोजी सर्व आरोपींना शिलाँग जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आले, जिथून त्यांना पोलीस कोठडीत पाठवण्यात आले.
न्यायालयात हजर करण्यापूर्वी सोनमने पती राजा रघुवंशीच्या हत्येमध्ये आपला सहभाग असल्याचे मान्य केले होते. मेघालय पोलिसांनी जेव्हा तिच्या प्रियकर राज कुशवाहसोबत तिची समोरासमोर चौकशी केली, तेव्हा तिने आपला गुन्हा कबूल केला.