सर्वकाही या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अवधूतने हा किस्सा सांगितला. तो म्हणाला, "ऐका दाजिबा हिट झालं. त्यानंतर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी माझी ओळख झाली. मला त्यांचं दर्शन झालं. मला त्यांचं खूप प्रेम मिळालं. फार मोठा माणूस महाराष्ट्राला लाभला. ते ज्या काळात त्या ठिकाणी होते तेव्हा त्यांच्या आसपासच्या परिसरात असण्याचं सौभाग्य जर कोणाला लाभलं असेल ती भाग्यवान माणसं होती."
advertisement
( स्वानंदीनंतर 'तारिणी' येतेय, पण कधी? किती वाजता? काय आहे स्टोरी? )
अवधूतने सांगितलं, "त्यांनी मला पहिल्यांदा फोन केला. मिलिंद गुणाजी उद्धव ठाकरे यांचे मित्र. त्यांनी मला फोन करून सांगितलं की साहेबांनी तुला भेटायला बोलावलं आहे. तेव्हा मी पहिल्यांदा त्यांना भेटलो. पुढे मग ते थेट वारंवार बोलावत राहिले. त्यांच्यासाठी मी शिवसेनेचं गाणं केलेलं. मेन शिवसेनेचं जे गाणं आहे ती कल्पना त्यांचीच होती. त्याआधी ठाण्याचं एक गाणं केलं होतं. ठाण्यावर त्यांची भयंकर खूप प्रेम होतं. त्यांनी मला गाणं करायला सांगितलं होतं ते असं होतं, शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना."
अवधूत बाळासाहेबांचा किस्सा सांगत म्हणाला, "त्या गाण्यानंतर मी कधीही मातोश्रीमध्ये त्यांच्या फ्लोरला गेलो की मी आतमध्ये गेल्या गेल्या ते बघायचे आणि माझ्याकडे बघून म्हणायचे, 'शिवसेनेचा अवधूत, अवधूतची शिवसेना'."
जय जय महाराष्ट्र माझा
अवधूतच्या करिअरला कलाटणी देणाऱ्या जय जय महाराष्ट्र माझा या गाण्याचा किस्सा देखील त्याने सांगितला. तो म्हणाला, "त्यानंतर मी जय जय महाराष्ट्र माझा हे गाणं केलं. त्याआधी त्यांनी 'मी मुंबईकर' नावाची चळवळ सुरू केली होती. त्याचं गाणं करायचं ठरलं, मी ते केलं देखील पण ते कधीच रिलीज झालं नाही. मी मुंबईकरची कल्पना तिच होत की, मुंबई कोणाती, खरा मुंबईकर कोण. त्यानंतर मला माझं जय जय महाराष्ट्र माझा हे गाणं सुचलं. मी ते गाणं केलं आणि त्यांना ऐकवायला गेलो. त्यात त्यांचा काही आदेश नव्हता. ते मी स्वत: केलं. त्यांनी ते ऐकलं आणि ते म्हणाले, मस्त आहे कर. त्यानंतर ते गाणं सुपरहिट झालं. तेव्हा कॉन्ट्रोवर्सी झाली. राष्ट्रवादीच्या लोकांनी माझी पोस्टर जाळली, सिड्या जाळल्या."
शिवसेना शिवसेना गाण्याचा किस्सा आणि राजकीय प्रचार गीतांचा प्रवास
"2005-2007 साली बाळासाहेबांनी मला बोलावून घेतलं आणि सांगितलं की आपल्याला शिवसेनेचं अँथम बनवायचं आहे. तेव्हापासून माझी राजकीय क्षेत्रातील कलेतील वाटचाल सुरु झाली. शिवसेनेचं अँथमनंतर त्याच्याइतकं राजकीय गाणं कोणतंच झालं नाही. इतक पक्षांनीही ते गाणं स्वत:च्या पक्षात वाजवलं. त्यानंतर मला पवार साहेबांनी बोलावून घेतलं. सुप्रिया जींनी माझ्याकडून राष्ट्रवादीचं गाण करून घेतलं. मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी असं ते गाणं होतं. त्यानंतर राज साहेबांनी बोलावून घेतलं. तुमच्या राजाला साथ द्या, हे गाणं खूप गाजलं. या गाण्याला साधारण 8 वर्ष झाली", असं अवधूतने सांगितलं.