मुंबई: सध्या जिकडेतिकडे बिग बॉस मराठी सीजन 5ची चर्चा आहे. 70 दिवसांचा हा सीजन आता संपणार याचं प्रेक्षकांना वाईट वाटतंय, परंतु टीआरपीचे मोठमोठे रेकॉर्ड मोडणारा हा खेळ कोण जिंकणार हे पाहण्याची उत्सुकताही जबरदस्त आहे. 2 दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरातून सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर बाहेर पडल्या. ऐशी, नव्वदच्या दशकात त्यांनी कोट्यावधी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आजही त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. बिग बॉसच्या घरातला त्यांचा खेळही प्रेक्षकांना आवडला. परंतु त्यापेक्षा जास्त प्रेम मिळालं त्यांचं मराठी भाषेवरील प्रभुत्त्व, संयमी भूमिका आणि स्वभावाला.
advertisement
वर्षाताई घराबाहेर पडल्यानंतर 'लोकल18'ने त्यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. त्यात त्यांनी घरात जाताना काय ठरवलं होतं, स्पर्धकांविषयी, आपल्या संवाद कौशल्याविषयी, खेळाविषयी, टास्कविषयी, भरभरून सांगितलं.
तुमच्यात एवढी सहनशीलता कशी आहे, असं विचारलं असता वर्षाताई म्हणाल्या, 'मला वाटतं अनेक पावसाळे पाहिल्याचा परिणाम आहे. अनेक पावसाळे बघण्याआधी मी अशी नव्हते. निश्चितपणे माहित होतं की, तिथे तापदायक असं वातावरण असेल, त्याला मी सामोरी जाईन. मला माझे जवळचे म्हणायचे हात कोणावर उचलू नका. समोरचे प्रवृत्त करतात, असं होतं तसं होतं अशा हॉरर कहाण्या मी ऐकल्या होत्या, भयानक, पण मी म्हटलं मी कोणावर हात उचलू शकत नाही आणि तसंच घडलं. प्रेक्षकांचं प्रेम बघून खूप छान वाटतं, धन्य झाले. मी ठरवलं होतं की, असं कोणी बोलायला नको, वर्षाताईंनी टास्कमध्ये सहभाग घेतलाच नाही. मी माझ्या पद्धतीने माझा वाटा दिला, याचा आनंद आहे. ज्यात मी संचालक होते, ज्यात प्रत्यक्ष सहभागी व्हायचं होतं, ज्यात घरातला सहभाग होता, त्या प्रत्येक टास्कमध्ये मी सहभागी झाले.'
हेही वाचा: Bigg Boss Marathi 5 : बिग बॉसमध्ये वोट कसं करायचं? उरलेत काही तास; कोण मारणार बाजी?
बिग बॉसच्या घरातलं सर्वात आवडतं काम कोणतं? याचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं, 'मला पाइनॲपलचं सलाड करायला आवडत होतं, भांडी पुसायला आवडत होती. ते मी खूप मनापासून आणि आवडीने करत होते.' यावरून त्यांना अंकिताला भांडी घासण्याचा ट्रॉमा आहे याबाबत काय वाटतं असं विचारलं, तर त्या म्हणाल्या, 'असेल, काहीजणांना ट्रॉमा असतो, पण ती स्वयंपाक चांगला करायची. माझं पाककौशल्य नाहीये, त्यामुळे मी कधीच त्या भानगडीत पडले नाही. तिचं वाक्य आहे ते खरं असेल, ट्रॉमा म्हणजे कंटाळा असेल.'
सूरजला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतंय यावर वर्षाताई म्हणाल्या, 'सूरजला त्याच्या बॅकग्राऊंडमुळे खूप सिम्पत्ती मिळाली एवढं खरं, पण त्यापेक्षा त्याने आपली कर्तबगारी, खेळावरची पकड सिद्ध केलीये. हळूहळू का होईना त्याचा आलेख चढता आहे, उतरता नाही. ही जमेची बाजू आहे. जान्हवीचीसुद्धा चढती बाजू आहे. निक्कीचा खेळ आक्रमक आहे. तिने कधीच खेळाची पकड ढिली केली नाही. तिची आक्रमकता, उताविळपणा, अर्वाच्च बोलणं हे शेवटपर्यंत तसंच आहे. त्यात काही बदल नाही. अभिजीतचासुद्धा चढता आलेख आहे.'