बॉलिवूडमधून दु:खद माहिती समोर येत आहे. बॉलिवूडचे हि मॅन अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र गेली अनेक दिवस आजारी होते. 30 ऑक्टोबर रोजी त्यांनी धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात श्वास घेण्यास त्रास होत असल्याने दाखव करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. 12 दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांच्यावर जुहू येथील त्यांच्या घरी पुढील उपचार सुरू होते. उपचारांती त्यांची प्राणज्योत मालवली असून त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
advertisement
'इक्कीस' ठरला शेवटचा सिनेमा
धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती समोर येताच देओल कुटुंबावर शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्या जाण्याने बॉलिवूडची मोठी हानी झाली आहे. ही हानी कधीन न भरून निघणारी आहे. धर्मेंद्र यांनी त्यांच्या अभिनय कारकीर्दीत आतापर्यंत 300 हून अधिक सिनेमात काम केलं. तब्बल 60 वर्ष त्यांनी हिंदी सिनेसृष्टीवर राज्य केलं. वयाच्या 89 व्या वर्षीही ते काम करत होते. त्यांचा इक्कीस हा शेवटचा सिनेमा ठरला. इक्कीस हा सिनेमा येत्या 25 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. काही तासांआधीच इक्कीस या सिनेमातील धर्मेंद्र यांचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. 'मेरा बड़ा बेटा अरुण ये हमेशा इक्कीस का ही रहेगा', असा त्यांचा डायलॉगही ऐकायला मिळतोय.
काही दिवसांआधी निधनाच्या अफवा
धर्मेंद्र यांच्या शेवटच्या काळात संपूर्ण देओल कुटुंबीय त्यांच्याबरोबर होतं. दरम्यान रुग्णालयात असताना धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती समोर आली होती. मात्र त्यांचा मुलगा अभिनेते सनी देओल आणि हेमा मालिनी यांनी ही माहिती खोटी असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर देओल कुटुंबीयांच्या प्रायव्हसीचा आदर करा असं सांगण्यात आलं होतं. त्याचबरोबर कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन देखील देओल कुटुंबाकडून करण्यात आलं होतं.
धर्मेंद्र यांचा जन्म
धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली गावात झाला. त्यांचं खरं नाव धर्मसिंग देओल असं होतं. ते एका जाट शीख कुटुंबातून आले आहेत. त्यांचे वडील केवल किशनसिंग देओल हे एका सरकारी शाळेत मुख्याध्यापक होते. तर त्यांची आई सतवंत कौर ही अत्यंत धार्मिक होती.
धर्मेंद्र कुटुंब
धर्मेंद्र यांनी दोन लग्न केली. प्रकाश कौर या त्यांच्या पहिल्या पत्नी. तर अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी त्यांनी दुसरं लग्न केलं. धर्मेंद्र यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या त्यांच्या दोन पत्नी, सहा मुलं, 13 नातवंडे, 2 सुना आणि एक नातसुन असा परिवार आहे.
धर्मेंद्र यांचे प्रसिद्ध सिनेमे
शोले (1975), धर्मवीर (1977), गुलामी (1985), फूल और पत्थर (1966), सत्यकाम (1969), हकीकत (1964), बंदिनी (1963), आँखें (1968), मेरा गाँव मेरा देश (1971). धर्मेंद्र यांनी कॉमेडी आणि रोमँटीक सिनेमातही काम केलं. चुपके चुपके (1975), सीता और गीता (1972), राजा जानी (1972), जुगनू (1973), लोफर (1973), चरास (1976), राम बलराम (1980). त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या उतार वयातही सिनेमात काम केलं. अपने (2007), जॉनी गद्दार (2007), लाइफ इन अ... मेट्रो (2007), यमला पागला दीवाना (2011), रॉकी और रानी की प्रेम कहानी (2023), तेरी बातों में ऐसा उलझा जिया (2024) हे त्यांचे अलिकडे गाजलेले सिनेमे आहेत.
