पुणे : नृत्यांगना आणि अभिनेत्री गौतमी पाटीलच्या चालकाने पुण्यात एका रिक्षाला धडक दिली. या अपघात प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे. रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी गौतमी पाटील हिच्यावर गंभीर आरोप केले आहे. या प्रकरणी आता शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक मैदानात उतरले आहे. गौतमी पाटीलच्या विरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या मांडला होता.
advertisement
४ दिवसांपूर्वी पुण्यामध्ये गौतमी पाटीलच्या कारचालकाने रिक्षाचालकाला धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पण, दुसरीकडे अपघाताच्या ठिकाणाहून संशयास्पद पद्धतीने कार हलवण्यात आली. ४ दिवस उलटले तरी गौतमीच्या टीमकडून जखमी रिक्षाचालक कुटुंबीयांची साधी विचारपूसही झाली नाही. या प्रकरणी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी प्रकरणाच्या चौकशी मागणी करत गौतमीवर गंभीर आरोप केले आहे.
रिक्षाचालक कुटुंबासाठी पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशन समोर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गौतमी पाटील विरोधात आंदोलन केलं. 'महाराष्ट्राचा बिहार करणारी गौतमी पाटील मागील ४ दिवसांपासून राज्यभरात नाचगाण्याचे कार्यक्रम करत आहे. पण आपल्या कारने ज्या रिक्षाचालकाला धडक दिली, त्या कुटुंबाबद्दल साधी विचारपूसही तिने केली नाही. या प्रकरणात पोलिसांनी ३० सप्टेंबरला पोलीस स्टेशनला हजर राहण्याचे आदेश दिले होते, पण तरीही गौतमी पोलीस स्टेशनला आली नाही, म्हणून गौतमी पाटीलचे राज्यातील शो बंद करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकानी सिंहगड पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं.
'पुण्यात गौतमी पाटीलच्या गाडीच्या चालकाने अपघात केला अपघातात जखमी ऑटो रिक्षा चालक रुग्णालयात उपचार सुरू असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अशावेळी गौतमी पाटीलला सिंहगड पोलिसांनी 30 तारखेला चौकशीसाठी बोलवल्या असता न येता शो करत महाराष्ट्रात फिरत आहे. निर्लज्ज गौतमी पाटील आणि अपघात स्थळावरून वाहन हलवणाऱ्या टोईंग चालकाला पोलीस स्टेशनमध्ये उपस्थितीत करा, या प्रकरणाची सखोल चौकशी करा' अशी मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी लावून धरली.
गौतमी पाटीलच्या टीमवर रिक्षाचालक कुटुंबीयांचा गंभीर आरोप
दरम्यान, रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे यांच्या कुटुंबीयांनी गौतमी पाटीलवर गंभीर आरोप केले आहे. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी पंचनामा न करत गौतमी पाटील हिची गाडी हलवण्यात आली होती. ही गाडी कुणी हलवली? आम्हाला संशय आहे की, पोलिसांनी ज्या ड्रायव्हरला अटक केली आहे, तो मुळ ड्रायव्हरच नाही. पोलीस स्टेशनला दुसराच ड्रायव्हर हजर करण्यात आला. एवढंच नाहीतर फिर्यादीही बदलण्यात आले आहे, असा आरोप मरगाळे कुटुंबीयांनी केला.
तसंच, जेव्हा अपघात घडला तेव्हा गौतमी पाटील या कारमध्ये होत्या, त्यांना समोर आणलं पाहिजे. गाडी मालक या गौतमी पाटील आहे तर त्या समोर का येत नाही. पोलिसांना विचारलं तर पोलीस सांगतात की, गौतमीला नोटीस दिली आहे. पण प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करत आहे का? आम्ही सामन्य घरातले आहोत म्हणून तपास करायचा नाही का? तसं असेल तर पोलिसांनी सांगावं. मुळात अपघात झाल्यानंतर गौतमी पाटील यांच्या टीमकडून साधी विचारपूसही झाली नाही. गौतमी पाटील यांचं कार्यक्रम आजही सुरूच आहे. पण त्यांनी पुढं येऊन साधी विचारपूसही केली नाही. यामुळे त्या कुठे घाबरल्या आहेत का? या प्रकरणी आम्ही पोलीस आयुक्तांकडे जाणार आहोत, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणीही रिक्षाचालक मगराळे यांच्या मुलीने केली आहे.