शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहायचं असेल, तर दिनचर्येत योगासनं करायला सुरुवात करा. ताडासन, पश्चिमोत्तानासन, सेतुबंध सर्वांगासन, मलासन, बालासन यासारख्या योगासनांमुळे केवळ शरीर लवचिक आणि तंदुरुस्त राहत नाही तर मन शांत होतं आणि आत्मविश्वास वाढतो.
ताडासन - आयुष मंत्रालयानं योगासनांचं महत्त्व सांगणारी पोस्ट नुकतीच शेअर केली आहे. या पोस्टच्या माहितीनुसार, योगासनांची सुरुवात ताडासनानं करावी. दिसायला सोपं असलेलं हे आसन शरीरासाठी महत्त्वाचं आहे. ताडासन केल्यानं शरीराची स्थिती सुधारते, पाठीचा कणा सरळ राहतो आणि संतुलन सुधारतं. याशिवाय, हे आसन संपूर्ण शरीराला ताणण्यास मदत करतं, ज्यामुळे स्नायू ताणले जातात आणि लवचिकता वाढते. वयाच्या तिशीच्या टप्प्यावर, जेव्हा शरीराचे स्नायू सैल होऊ लागतात, तेव्हा ताडासन त्यांना पुन्हा सक्रिय करण्याचं काम करतं.
advertisement
Health tips : आयुर्वेदिक औषधांची उपयुक्त मात्रा, शरीरासाठी शक्तिशाली ठरतील हे उपाय
पश्चिमोत्तानासन - पश्चिमोत्तानासन हे एक अतिशय प्रभावी योगासन. पाठ, पाय आणि पोटासाठी हे आसन फायदेशीर आहे. या आसनात, शरीराला पुढे वाकवून पायांच्या बोटांना धरून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. या योगाभ्यासामुळे पाठीचा कणा मजबूत होतो आणि स्नायूंचा ताठरपणा कमी होतो. वयाच्या तिशीत, पाठ कडक होणं किंवा पायात लवकर थकवा जाणवायला सुरुवात होते. तेव्हा हे आसन शरीरातल्या या भागांना आराम देतं आणि लवचिकता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं.
सेतुबंध सर्वांगासन - सेतुबंध सर्वांगासनाला ब्रिज पोझ असंही म्हणतात. पाठ आणि पोटासाठी हे आसन फायदेशीर आहे. हे आसन पाठीवर झोपून केलं जातं, ज्यात शरीर वर करून ब्रिजचा आकार तयार होतो. या आसनामुळे पाठीचा कणा मजबूत होतो, थायरॉईड ग्रंथी सक्रिय करते आणि पचन सुधारतं.
Diabetes : मधुमेह नियंत्रणासाठी हे नक्की करा, तब्येत चांगली राहण्यासाठी सोपा उपाय, वाचा सविस्तर
मलासन - मलासन विशेषतः महिलांसाठी फायदेशीर आहे. या आसनानं पेल्विक एरिया मजबूत होतो, कंबर आणि मांड्यांची ताकद वाढते आणि बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो. महिलांमधे तिशीत हार्मोनल बदल देखील होऊ लागतात. या काळात, हे आसन शरीर संतुलन आणि मानसिक विश्रांतीसाठी महत्त्वाचं आहे.
याशिवाय, बालासनामुळे शरीर आणि मनाला आराम मिळतो. या योगासनामुळे ताण कमी होतो, पाठीच्या कण्याला आराम मिळतो आणि संपूर्ण शरीराला विश्रांती मिळते. दिवसभराचा थकवा शरीरात जाणवत असेल किंवा मन अस्वस्थ असेल तर बालासनानं त्वरित शांती मिळते.
