अहमदनगर, 31 जुलै : राहुरी तालुक्यातील उंबरे गावात ट्यूशन आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थींनींचं जबरदस्तीनं धर्मांतर करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला होता. दरम्यान यानंतर उंबरे येथील पालकांनी आपल्या मुलींना शाळेत पाठवणं बंद केलं आहे. या प्रकरणातील आरोपी गजाआड झाले आहेत, मात्र, अजूनही पालकांमध्ये भीती असल्यानं त्यांनी मुलींची शाळा बंद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
advertisement
उंबरे गावामध्ये पाचवी ते दहावीची शाळा आहे, या शाळेत एकही मुलगी उपस्थित नव्हती. 200 पेक्षा जास्त मुली याठिकाणी शिक्षण घेतात, पण पालक मुलींना शाळेमध्येच पाठवायला तयार नाहीयेत. शिकवणीसाठी गेलेल्या मुलींचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे पालक धास्तावले आहेत.
'या शाळेमध्ये 257 मुली आणि 309 मुलं आहेत, एकूण 566 पट आहे, पण आज एकही मुलगी शाळेत आलेली नाही. हा पालकांचा निर्णय आहे, त्यामुळे आम्हाला काही सांगता येणार नाही,' अशी प्रतिक्रिया शाळेच्या शिक्षकांनी दिली आहे.
'आम्ही गावातली इज्जत जपणारी माणसं आहोत. आमच्यामध्ये घबराटीचं वातावरण आहे,' असं शाळेतल्या एका मुलीच्या पालकाने सांगितलं आहे.
तीन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणे आणी विननभंगाच्या तक्रारीनंतर राहुरी तालुक्यातील उंबरे गावातील सामाजिक वातावरण बिघडले होते. परस्पर विरोधी तीन तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर 13 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. हे प्रकरण आणखी गंभीर वळणावर आले असून कोचिंग क्लास घेण्याच्या माध्यमातून हिंदू मुलींचे धर्मान्तर करण्यास प्रवृत्त केलं जात असल्याची धक्कादायक माहीती समोर आली. या प्रकरणी अगोदर एक गुन्हा दाखल होता आता आणखी दोन मुलींनी गुन्हा दाखल केला असून शिक्षिकेसह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे तर चार आरोपींना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
दोन अल्पवयीन मुलींनी समोर येत आम्हाला आम्हाला धर्म बदलण्यासाठी प्रवृत्त केलं जात असल्याचं म्हटलंय, तर बोगस अकाउंट बनवून फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली गेली आहे. शिकवणीला जात असलेल्या ठिकाणच्या शेख या शिक्षिकेने आमची त्यांच्या समाजातील मुलांशी ओळख करून देत सेल्फी काढण्यास सांगितले असल्याची फिर्यादही दिली गेली आहे.
