शिर्डीत 8 दिवसांपूर्वी लुटीच्या उद्देशाने चाकू हल्ला झाला होता. यात साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या झाली होती. यानंतर शिर्डीत खळबळ उडाली होती. दुहेरी हत्याकांडानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत अवैध व्यवसायांवर कारवाई सुरू केली. आता शिर्डीचे ग्रामस्थ देखील आक्रमक झाले असून ग्रामसभा घेत शिर्डीतील व्यवसायिकांसाठी आचारसंहिता तयार केलीये.
advertisement
नुकतेच शिर्डीत ग्रामसभेनंतर माजी खासदार सुजय विखे आणि ग्रामस्थांची बैठक झाली. यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा होऊन 7 कलमी आचारसंहिता बनवण्यात आल्याची माहिती माजी खासदार विखे यांनी दिली. शिर्डीतील सर्व दुकाने रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच बाहेरून आलेल्या व्यवसायिकांची चौकशी करण्यात येणार आहे.
7 कलमी आचारसंहिता
- शिर्डीतील सर्व दुकाने रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत बंद राहणार.
- शिर्डी नगरपरिषद हद्दीतील सरकारी जागेतील सर्व मंदिरातील ट्रस्ट एकत्र करून शिर्डी ग्रामस्थ ट्रस्ट स्थापन करण्यात येणार. यात खंडोबा मंदिर, हाजी अब्दुलबाबा समाधी, लक्ष्मीआई मंदिर, मारुती मंदिर, शनी व गणेश मंदिर यासह इतर मंदिरे यांचे खाजगी ट्रस्ट बरखास्त करण्यात येणार असून ही सर्व मंदिरे शिर्डी ग्रामस्थ ट्रस्ट यांच्या नियंत्रणाखाली आणणार..
- शिर्डीत बाहेरुन येणाऱ्या व्यावसायिकांची चौकशी करून कारवाई होणार.
- शिर्डी शहरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर करवाई करण्यात येणार.
- शिर्डीतील गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक अधिकारी व कर्मचाऱ्यांचं एक पथक तैनात ठेवण्याची मागणी.
- अतिक्रमण केलेल्या व्यक्तींना पर्यायी जागा देवून देखील अतिक्रमण काढत नसल्यास त्यांच्यावर सक्तीची कारवाई होणार.
- शिर्डीतील प्रत्येक व्यक्तीचं डोर-टू-डोर व्हेरीफिकेशन केल जाणार. त्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून आऊटसोर्स पद्धतीन काम देत बाहेरील व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार.
दरम्यान, आज शिर्डीत साई परिक्रमा महोत्सव आहे. यामध्ये हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात. साई नामाचा जयघोष, पारंपरिक वाद्यांच्या तालात परिक्रमेस सुरुवात झाली आहे.