संघटनात्मक अडथळे दूर करून संघटन अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने नव्या पदाची निर्मिती करण्याचा मनोदय अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी बोलून दाखवला. त्यानुसार पक्षाच्या नियमित मंगळवारच्या बैठकीत नव्या पदाची निर्मिती करण्यात आली. मुंबईतील एनएससीआय, वरळी येथे आमदार आणि जिल्हाध्यक्षांच्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णयाची घोषणा करण्यात आली.
नव्या पदांमुळे राज्य नेतृत्व आणि जिल्हा पातळीवरील संघटनांमध्ये समन्वय अधिक बळकट होणार आहे. तळागाळातील संघटन मजबूत करण्यावर आणि पक्षातील शिस्त वाढवण्यावर भर देण्यात येत आहे.
advertisement
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सर्वंकष आराखड्याची आखणी सुरू आहे. निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी पक्षात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. पक्षाचे ‘राष्ट्रवादी कनेक्ट’ अॅप लाँच करण्यात आले असून कार्यकर्त्यांशी संवाद आणि समन्वय सुलभ होणार आहे, जिल्हानिहाय ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ कार्यक्रम नियमितरित्या आयोजित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. आमदार, जिल्हाध्यक्ष आणि बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांमध्ये एकसंध समन्वय राखण्यावर भर देण्यात येणार आहे.
शिस्त, संघभावना आणि जबाबदारी यांना प्राधान्य द्या असा संदेश पक्ष नेतृत्वाने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिला आहे. आगामी निवडणुकांसाठी बूथ पातळीवरची संघटना मजबूत करण्याला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असून त्यादृष्टीने जोरदार तयारी करा, अशा सूचना तटकरे यांनी दिल्या.