अमरावती, 28 ऑगस्ट : दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. कैकजण रस्त्यावर आले. या व्यसनापाई रावाचेही रंक झाले. पुरुषांच्या दारुच्या व्यसनाचे बळी नेहमी महिला ठरतात. त्यामुळे अनेकदा महिला पोलिसांच्या मधील मदतीने गावात दारूबंदीकडे वळतात. मात्र, अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा ग्रामपंचायतीमध्ये गावकऱ्यांनी चक्क अनधिकृत सुरू असलेली दारू विक्री सुरू रहावी यासाठीचा ग्रामसभेचा ठराव एकमताने पास केला. या घटनेने जिल्ह्यात एकच चर्चा सुरू झाली.
advertisement
अमरावती जिल्ह्यतील आष्टा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या गावात भिकाजी महाराज यांचे मोठे संस्थान आहे. या संस्थानने ग्रामपंचायतकडे दारूबंदीसाठी अर्ज दिला. त्यावर ग्रामसभेत दारूबंदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र, या प्रस्तावाला ग्रामसभेतील काही गावकऱ्यांनी विरोध केला. चक्क अनधिकृतरित्या सुरू असलेली दारूबंदी होऊ नये व ती दारू विक्री सुरूच राहावी यासाठी गावकऱ्यांनी बहुमत दर्शविले. यामध्ये हात वर करून बहुमत दर्शवित असताना विशेष म्हणजे यामध्ये महिलांनी सुद्धा हात वर करून याला बहुमत दर्शविले. हा अजब प्रकार आष्टा ग्रामपंचायतमध्ये घडला.
वाचा - शरद पवार का अजित पवार? पुण्याच्या आमदाराने दोन महिन्यांनंतर कोंडी फोडली
एकीकडे पुरोगामी महाराष्ट्रात दारूबंदी व्हावी यासाठी गावकरी आग्रही असतात. मात्र या ठिकाणी दारूबंदीलाच गावकऱ्यांनी विरोध केल्याचं पाहायला मिळालय. खरतर यासाठी गावातील सरपंच आणि गावातील काही पुढाऱ्यांनी एकत्र येऊन दारुबंदीसाठी प्रयत्न करायला हवेत. इथं मात्र याच्या अगदी उलट घडलं आहे. दरम्यान, ज्या संस्थानने दारू बंदीसाठी अर्ज दिला होता. त्यांनी हा ठराव झाल्याने आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. गावात असलेल्या शाळा व भिकाजी महाराज संस्थांन जवळच अवैधरित्या दारू विक्री होते.