अमरावती, 25 ऑगस्ट : आगामी काळातील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय आपापल्या पद्धतीने मतदार संघाचा आढावा घेत आहेत. त्याचप्रमाणे भाजपने देखील राज्यातील सर्व लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
advertisement
काय म्हणाले बावनकुळे?
विदर्भात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे आगामी अमरावती लोकसभा मतदारसंघातही भाजपचाच उमेदवार देण्यात यावा, असा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझा आग्रह राहिल. सध्या विद्यमान खासदार नवनीत राणा या देखील आमच्या एनडीएचा घटक आहेत. त्यामुळे त्यांनी अमरावती लोकसभेची निवडणूक ‘कमळ‘वर लढवावी, असा आमचा प्रयत्न राहिल. आमची इच्छा आहे की नवनीत राणा यांनी कमळावर निवडणूक लढावी. पण, शेवटी वरिष्ठ निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर नवनीत राणा ह्या NDA च्या घटक असल्याचेही बावनकुळे म्हणाले. दरम्यान आता नवनीत राणा ह्या भाजपमध्ये जाऊन कमळावर लोकसभा निवडणूक लढतील का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
उद्धव ठाकरेही विदर्भ दौऱ्यावर
उद्धव ठाकरे लोकसभा मतदार संघनिहाय आढावा बैठकीच्या दुसऱ्या टप्प्यातील अखेरच्या दिवशी नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. विशेष म्हणजे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मतदारसंघ असलेल्या नागपूर मतदारसंघाचा ठाकरे यांच्याकडून आढावा घेतला जाणार आहे. वास्तविक या मतदार संघात ठाकरे गटाचा उमेदवार देण्यात येईल, अशी शक्यता नाही. मात्र, तरीही निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून या मतदार संघाचा आढावा ते घेणार आहेत. इंडिया आघाडीत लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना नागपूर लोकसभा मतदारसंघात मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसला बळ देण्याची तयारी ठेवा, असा आदेश ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
वाचा - 'मी पुन्हा सांगते राष्ट्रवादीत फूट..' सुप्रिया सुळे यांनी 'त्या' चर्चांना दिला पूर्ण विराम
मित्र पक्षाला बळ देत असताना आपला पक्षाची संघटनात्मक काम मागे पडू देऊ नका, पक्ष बांधणी मजबूत ठेवा अशाही सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये आपला पक्ष उमेदवार देईल तर नागपूर लोकसभा मतदारसंघात आपल्याला मित्र पक्षाला बळ द्यावा लागेल. त्यामुळे पुढील निवडणुकांची परिस्थिती लक्षात घेऊन पक्ष बळकटीसाठी तयारी करा आपला पक्ष सुद्धा या लोकसभा मतदारसंघात वाढवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन ठाकरे यांनी केलं आहे.