भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी मनसेवर आज पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली आहे. आशिष शेलार यांनी मनसेवर जोरदार हल्लाबोल केला. राज ठाकरे यांना मराठी भाषेवरून आव्हान देणारे व्यावसायिक सुशील केडिया यांनी आव्हान दिले होते. त्यानंतर मनसैनिकांनी शनिवारी केडियाच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यानंतर आता मुंबईत झालेल्या भाषावादाच्या पार्श्वभूमीवर, शेलार यांनी मनसेच्या कार्यपद्धतीची थेट काश्मीरमधील दहशतवाद्यांशी तुलना करत खळबळजनक वक्तव्य केले.
advertisement
मनसैनिकांची दहशतवाद्यांसोबत तुलना...
आशिष शेलार यांनी म्हटले की, "पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदू पर्यटकांवर गोळ्या झाडल्या जातात आणि इथे (महाराष्ट्रात) भाषा विचारून हिंदू धर्मीयांवर हल्ले केले जात आहेत. यात फरक काय?" असा सवाल करत शेलार यांनी मनसेवर गंभीर आरोप केला. त्यांनी स्पष्ट केलं की, सत्तेत भाजप मोठा भाऊ असल्यामुळे संयम पाळतो आहोत, पण या संयमाची परीक्षा पाहू नका, असा इशाराही त्यांनी मनसेला दिला.
मुंबईसह राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून मराठी-हिंदी भाषेच्या मुद्यावरून वातावरण तापलं आहे. काही ठिकाणी बिगर मराठी नागरिकांना झालेल्या कथित मारहाणीच्या घटना, सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वाद वाढला. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी हा थेट आणि तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
शेलार यांच्या या वक्तव्याने आगामी काळात भाजप-मनसे संबंधात दरी वाढणार की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर, शेलार यांच्या वक्तव्यावर मनसैनिक कशी प्रतिक्रिया देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.