इंद्रजित सावतं सांगतात की, “रायगड किल्ल्याचे बांधकाम तत्कालीन खगोलशास्त्रीय अभ्यास आणि शास्त्रोक्त पद्धतीने झाले होते. सौम्ययंत्र हे उपकरण त्या काळातील वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्र यांच्या समन्वयाचे प्रतीक आहे. हे यंत्र सूर्य, चंद्र आणि इतर खगोलीय पिंडांच्या हालचालींचा अभ्यास करून किल्ल्याच्या बांधकामासाठी दिशा आणि कालमापन निश्चित करण्यास उपयोगी ठरले असावे. या यंत्राच्या शोधाने रायगडाच्या बांधकामातील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तत्कालीन तंत्रज्ञानाची प्रगती अधोरेखित झाली आहे.”
advertisement
Travel: धुकं आणि पाऊस, स्काय सायकलिंगचा आनंद घ्यायचाय? पावसाळ्यात द्या मेळघाटला भेट, Video
संभाजीराजे छत्रपती यांनी या शोधाबाबत फेसबुक पोस्टद्वारे माहिती देताना सांगितले की, “गेल्या तीन ते चार वर्षांपासून रायगडावर उत्खननाचे कार्य सुरू आहे. या उत्खननात रोपवे अप्पर स्टेशनच्या मागील बाजूस, कुशावर्त तलावापासून ते बाजारपेठ आणि जगदीश्वर मंदिरापर्यंतच्या भागात शिवकालीन वाड्यांचे अवशेष सापडले आहेत. या अवशेषांमधून स्वराज्याच्या प्रशासकीय आणि सांस्कृतिक वैभवाची झलक मिळते. याच उत्खननादरम्यान सौम्ययंत्राचा शोध लागला, ज्यामुळे रायगडाच्या बांधकामातील खगोलशास्त्रीय दृष्टिकोनाचा पुरावा मिळाला.”
भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी आणि रायगड विकास प्राधिकरण यांनी या शोधाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यांच्या मते, सौम्ययंत्र हे केवळ खगोलशास्त्रीय उपकरणच नाही, तर स्वराज्याच्या वैज्ञानिक प्रगतीचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे. या यंत्राच्या अभ्यासातून रायगडाच्या बांधकामातील अचूकता, नियोजन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा अधिक खुलासा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
हा शोध इतिहासप्रेमींसाठी आणि संशोधकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. रायगड किल्ला केवळ एक लष्करी किल्ला नसून, तो स्वराज्याच्या वैज्ञानिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय प्रगतीचे केंद्र होता, हे या शोधाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. रायगड विकास प्राधिकरणाने यापुढेही उत्खननाचे कार्य सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून, भविष्यात आणखी काही महत्त्वपूर्ण पुरावे समोर येण्याची शक्यता आहे. याचे एक संग्रहालय रायगडाजवळ सुरू व्हावे, अशी अपेक्षा सावंत यांनी व्यक्त केलीये.
दरम्यान, यंत्रराज सौम्ययंत्राचा हा शोध रायगडाच्या गौरवशाली इतिहासाला नवे परिमाण देणारा ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या वैभवाची आणि वैज्ञानिक प्रगतीची साक्ष देणारा हा पुरावा मराठ्यांच्या इतिहासाचा अभिमान वाढवणारा आहे, अशी भावना इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केलीये.