अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी हायकोर्टाने राज्य सरकारला दणका दिला. या बनावट एन्काउंटर मधील सबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे राज्य सरकारला आदेश हायकोर्टाने दिले आहेत. अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी पोलिसांवर आरोप करत याचिका दाखल केली होती. आपल्या मुलाचा एन्काउंटर बनावट असून त्याला कट रचून मारण्यात आल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते. त्यावर हायकोर्टात मागील काही महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. या दरम्यान अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी आपल्या हा खटला पुढे नेण्यास रस नसल्याचे सांगितले. आपले वय झाले असून धावपळ करणे जमत नसल्याचे त्यांनी कोर्टाला सांगितले. त्यानंतर कोर्टान स्युमोटो पद्धतीने या याचिकेवर सुनावणी सुरू ठेवली. अखेर हायकोर्टाने आज राज्य सरकारला संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबनाचे आदेश दिले.
advertisement
आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट एन्काऊंटरमध्ये झाल्याचा न्यायालयीन चौकशीत ठपका ठेवण्यात आला होता. न्यायालयीन चौकशीत 4 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रथमदर्शनी दोषी ठरवण्यात आले आहे.
मुंबई पोलीस करणार तपास...
हायकोर्टाकडून मुंबई पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईचे गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक स्थापन करून तपास होणार आहे. हे तपास पथक अक्षयच्या एन्काऊंटरचा तपास करणार आहे.
दरम्यान, पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले असले तरी या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासही सरकारला मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
