सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याच्या कारणावरून चर्चेत असलेल्या बीड जिल्हा कारागृह पुन्हा एकदा धर्मांतराच्या मुद्द्यावरून एकदा प्रकाश झोतात आले आहे. बीड जिल्हा कारागृहातील परिस्थिती गंभीर बनली आहे. खुनाच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आणि नुकताच जामिनावर बाहेर आलेल्या कल्याण वासुदेव भावले यांनी जेलर पीटर गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धर्मांतरासाठी दबाव, प्रलोभन आणि मारहाणीचे प्रकार कारागृहात सुरू असल्याचा भावले यांचा दावा आहे. तसेच भजन आरती आणि धार्मिक प्रार्थना ही बंद करून महापुरुषांचे फोटो काढायचा आहे त्यांनी सांगितले.
advertisement
धर्मांतर केले तर गुन्ह्यातून सोडवतो, पैसे देतो असे म्हणाले. नाही केल्यावर मारहाण केली, जेवण दिले नाही. आमची दाढी आणि केस कापायला लावले. भजन, आरती आणि प्रार्थना बंद केल्या, असे जामिनीवर बाहेर आलेले कल्याण वासुदेव भावले यांनी आरोप केला.
एवढेच नाही तर काही कैद्यांनी धर्मांतर केल्याचाही भावले यांनी दावा केला आहे. याच जेलरवर यापूर्वी जळगाव कारागृहातही असाच गंभीर आरोप झाल्याचे समोर आले आहे. जळगावच्या कारागृहामध्ये माझ्या पतीला धर्मांतरासाठी मारहाण केली. २२ ठिकाणी जखमा झाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. आता केस मागे घे म्हणत मला धमक्या देतात. ४० लाख रुपये देऊ असं सांगितले. माझ्या मुलांनाही जीवे मारण्याचे धमक्या दिल्या जात आहेत प्रत्येक तारखेला आल्यावर गुंडाकडून धमकावत असतात असे मिनाबाई जगताप यांनी सांगितले.
या दोन्ही घटनांनंतर जेलर पेट्रस गायकवाड पुन्हा चर्चेत आले आहेत. या अगोदर गोपीचंद पडळकर यांनीही बीड जिल्हा कारागृहात धर्म परिवर्तनाचे रॅकेट असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बीडमधील वकील राहुल आघाव यांनीही या संदर्भात माझ्या दोन पक्षकाराने तक्रार केल्याचेही सांगितले होते. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर जेलर पेट्रस गायकवाड यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकलेली नाही. मात्र कारागृहात अशा पद्धतीने धर्म परिवर्तनाचे रॅकेट सुरू असेल तर हे धक्कादायक आहे, अशा प्रतिक्रिया बीडमधील जनता व्यक्त करीत आहेत.