लिंबाच्या दरवाढीमागे मुख्य कारण म्हणजे बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये वाढलेली पाण्याची टंचाई. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अनेक गावांमध्ये विहिरी व बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. यामुळे शेतीसाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. पाण्याचा तुटवडा असल्याने लिंबाची झाडेही कमकुवत झाली आहेत. झाडांना वेळच्या वेळी पुरेसे पाणी मिळत नसल्याने फळधारणा कमी झाली असून लिंबांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे.
advertisement
बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा उत्पादनात 50 ते 60 टक्के घट झाल्याची माहिती दिली आहे. लिंबूचे झाड फळ देण्यासाठी नियमित पाण्याची गरज असते पण ती गरज पूर्ण न झाल्याने झाडांची वाढ खुंटली आहे. परिणामी बाजारात चांगल्या प्रतीचे लिंबू उपलब्ध नाहीत. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाल्याने लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या वाढीचा फटका सामान्य ग्राहकांबरोबरच छोट्या व्यापाऱ्यांनाही बसत आहे.
या परिस्थितीबाबत बोलताना स्थानिक व्यापारी नितीन पवार यांनी सांगितले की सध्या लिंबाला खूप मोठी मागणी आहे विशेषतः उन्हाळ्यात लोकांना सरबतासाठी लिंबू लागतो. पण शेतकऱ्यांकडे चांगल्या दर्जाचे लिंबू कमी उपलब्ध आहेत. आम्हालाही लिंबू जास्त दराने घ्यावा लागतो आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचवताना किंमत वाढवावी लागते. काही वेळा ग्राहकही नाराजी व्यक्त करतात पण आमच्याकडेही पर्याय नाही.
सध्या बाजारात छोट्या आकाराचे लिंबू देखील महाग दराने विकले जात आहेत. पूर्वी तीन ते चार लिंबांना जेवढी किंमत असायची आता एका लिंबासाठी तेवढी किंमत द्यावी लागते आहे.





