सोमवारी, विधानसभेत भाजप आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील विकास कामांच्या मुद्यावरून सरकार, प्रशासनाला धारेवर धरले. संजय केळकर यांनी ठाण्यातील विकास योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार झाला असून, बिल्डरधार्जिणा विकास आराखडा राबवण्यात आला असल्याचा आरोप केला. शिळफाटा ते कल्याण मार्गाचे तीन खोटे प्रस्ताव दाखवून कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला आहे, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. त्यांनी सरकारवर व प्रशासनावर थेट निशाणा साधत, कारवाईची मागणी केली आहे.
advertisement
संजय केळकर यांनी ठाण्यातील विकासकामांतील अनियमितता, टीडीआर घोटाळा आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या संपत्तीविषयी विधानसभेत आक्रमकपणे भूमिका मांडली. "ठाण्यातील शासकीय जमिनीचा टीडीआर बिल्डरला देण्यात आला आणि त्याने तो विकून स्वतःची तिजोरी भरली. यामागे कोणाचातरी आशीर्वाद आणि संगनमताशिवाय हे शक्यच नाही," असा घणाघात त्यांनी केला.
617 सदनिका गायब, कोर्टाच्या आदेशाशिवाय कारवाईच नाही!
केळकरांनी म्हटलं की, "बिल्डरने म्हाडाला 617 सदनिका देणं बंधनकारक होतं. मात्र त्या सदनिका परस्पर विकल्या गेल्या आहेत. हा थेट फसवणुकीचा प्रकार आहे. सात-सात मजल्यांच्या अनधिकृत इमारती उभ्या राहत आहेत, पण प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. फक्त कोर्ट आदेश देईल तेव्हाच काही हालचाल होते, ही परिस्थिती गंभीर आहे," असं सांगत त्यांनी ठाणेकरांना दिलासा देण्यासाठी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
महापालिका अधिकाऱ्यांची संपत्ती तपासा, श्वेतपत्रिका काढा
महापालिकेतील आजी-माजी अधिकाऱ्यांनी हॉटेल, रिसॉर्टसारख्या प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक केल्याचा आरोपही केळकरांनी यावेळी केला. "या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी झाली पाहिजे. मालमत्ता विभागात बोगस लोक भरवण्याचे काम सुरू आहे. आता यावर पांघरूण न टाकता श्वेतपत्रिका काढा," अशी मागणी त्यांनी केली.
एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा
या संपूर्ण आरोपांमध्ये केळकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेताच टीका केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून ठाण्यात एकनाथ शिंदे यांची पकड आहे. शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिंदे यांना सगळ्यात मोठा पाठिंबा ठाण्यातच मिळाला होता. त्यानंतर आता, भाजप आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील विकास कामे, बिल्डरांवर असलेली मेहेरनजरीचा मुद्दा उपस्थित करत शिंदे यांना कोंडीत पकडलं असल्याची चर्चा सुरू आहे. ठाण्यातील सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष टोला लगावत, "ही स्थिती कुणाच्या वरदहस्ताशिवाय शक्यच नाही," असे नमूद केले. त्यामुळे भाजपच्या नेत्याकडूनच सरकारला घरचा आहेर मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.