खरं तर, नगर परिषद आणि नगर पंचायतींचा निकाल लागण्यापूर्वीच राज्यात महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील २९ महानगर पालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. तर १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. या निकालात एकनाथ शिंदेंना आता मोठा धक्का बसू शकतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे. याचं कारण म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपनं शिंदे गटाला बालेकिल्ल्यात दिलेले हादरे.
advertisement
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभेतील अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला असून, येथे भाजपच्या तेजश्री करंजुले विजयी झाल्या आहेत. त्यांनी इथली ३५ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेतही भाजपच्या रुचिता घोरपडे यांनी सेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या पत्नीचा आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वीणा म्हात्रे यांचा पराभव केला आहे. हे दोन्ही नगर परिषदा वर्षानुवर्षे शिवसेनेचे गड राहिले आहेत. पण भाजपनं शिंदेंच्या या गडांना सुरुंग लावला आहे. त्यामुळे आगामी ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईची महानगर पालिका निवडणूक शिंदेंसाठी सोपी असणार नाही, असाच संदेश देण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं जोरदार मुसंडी मारल्याने ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईत जागा वाटपात भाजपचा दबाव आता वाढण्याची शक्यता आहे. महायुतीचा धर्म पाळण्यासाठी या महापालिकांमध्ये शिंदेंना बॅकफुटवर जावं लागू शकतं. शिंदेंनी राज्यभरात चांगलं यश मिळवलं असलं तरी भाजपच्या या खेळीमुळे आगामी निवडणुकीत आपला बालेकिल्ला सांभाळण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
अंबरनाथ आणि बदलापूरमधील भाजपच्या विजयामुळे ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईत एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी होईल. येथील वाटाघाटीत एकनाथ शिंदे अडकले तर राज्यातील इतर महापालिकांमध्ये भाजप शिंदेंना ओव्हर टेक करून खूप पुढे निघून जाऊ शकते, असं देखील राजकीय विश्लेषकांचं मत आहे. साहजिकच याचा परिणाम मुंबई महानगर पालिकेत देखील दिसून येईल. इथंही शिंदेंची पिछेहाट होण्याची शक्यता आहे.
