राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांना दिली जाणार असल्याची माहिती आहे. छगन भुजबळ गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होते. याबाबतची खंत त्यांनी वारंवार बोलून दाखवली होती. अनेकदा भुजबळांनी जाहीर कार्यक्रमांमध्ये याच मुद्द्यावरून नाराजीही उघडपणे बोलून दाखवली होती. मात्र, आता अखेर छगन भुजबळांची पुन्हा एकदा मंत्रिपदी वर्णी लागल्याने भुजबळांची नाराजी दूर झाली.
advertisement
छगन भुजबळ यांनी काय म्हटले?
मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी राजभवनला जाण्याआधी छगन भुजबळ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. त्याशिवाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचेही आभार मानले. भुजबळांनी मतदारांचे आभार मानताना समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.
भुजबळ यांना पहिल्या मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत राज्यात आंदोलन केले होते. छगन भुजबळ यांनी म्हटले की, मंत्रिमंडळातील समावेशाबाबत आठ दिवसांपूर्वीच निर्णय झाला होता. मंगळवारी मुंबईत सगळे मंत्री असतात. त्यामुळे मंगळवारी शपथविधीचे नियोजन करण्यात आले. नाराजीबाबत भाष्य करताना त्यांनी म्हटले की, ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं, असं त्यांनी म्हटले. नाशिकच्या पालकमंत्रीपदावर त्यांनी भाष्य करण्याचे टाळले.