छगन भुजबळ यांचे वय वर्षे ७८. त्यांच्यावर नुकतीच बायपास सर्जरी झालेली आहे. डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिलेला असतानाही भुजबळ यांनी मागचा पुढचा विचार न करता आपल्या प्रिय सहकाऱ्याला अखेरचे पाहण्यासाठी बारामतीची वाट धरली.
छगन भुजबळ यांनी ज्या रनवेपासून काही मीटरवर अपघात घडला तिथे जाऊन अपघाताची माहिती घेतली. तिथे उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांनी अपघात कसा घडला, प्रशासनाने कशी मदत केली, याची विचारपूस केली. दादा नाहीत, याच्यावर मला विश्वासच बसत नाही, असे ते म्हणाले. परंतु दुर्दैवाने आज हे वास्तव स्वीकारण्याची वेळ आपल्यावर आली असून, व्यक्तिगत मला स्वतःला देखील या धक्क्यातून सावरणं खूप कठीण जाणार आहे, असेही ते म्हणाले.
advertisement
सूर्योदयावेळी जेव्हा जग जागे होत असे तेव्हा दादा कामाला सुरुवात करायचे
अजितदादा आणि माझे नाते केवळ राजकीय सहकाऱ्यांचे नव्हते, तर ते त्या पलीकडचे होते. सन १९९९ मध्ये जेव्हा आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हापासून आम्ही खांद्याला खांदा लावून लढलो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत दादांचा तो स्पष्टवक्ता स्वभाव आणि कामाचं बोला म्हणण्याची त्यांची आग्रही पद्धत प्रशासनाला शिस्त लावणारी होती. दादांच्या कार्यशैलीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा असायची. ते रोज पहाटे ५ वाजता उठून कामाला लागत असत. सूर्योदयाच्या वेळी जेव्हा जग जागे होत असते, तेव्हा दादांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली असायची. सकाळी लवकरात लवकर जनतेच्या सेवेत हजर होणे आणि लोकांचे प्रश्न जागेवर निकाली काढणे, हा त्यांचा शिरस्ता होता. अशा कार्यतत्पर आणि शब्दाला जागणाऱ्या लोकनेत्याचे जाणे ही राज्याची कधीही न भरून निघणारी हानी आहे, असे भुजबळ म्हणाले.
