नारेगाव येथील आयशा सय्यद (वय 4) हिच्यावर 28 फेब्रुवारी रोजी पहाटे भीषण प्रसंग ओढवला होता. रमजान महिन्यामुळे सहरसाठी घरातील सर्वजण पहाटे सुमारे 3 वाजता उठले होते. त्याचवेळी आयशा घराच्या दारात उभी असताना अचानक 5 ते 6 मोकाट कुत्र्यांनी तिच्यावर झडप घातली. कुत्र्यांनी चावा घेत आणि नखांनी ओरबाडत तिच्या अंगावर गंभीर जखमा केल्या. काही क्षणांतच तिच्या शरीरावर 50 पेक्षा अधिक जखमा झाल्या आणि कुटुंबीय घाबरून गेले.
advertisement
तलावाच्या काठावर तिघांचे कपडे दिसले, संशय आला अन् थेट उड्या घेतल्या, ‘ते’ दृश्य पाहून गाव हादरलं
घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने आयशाला घाटी रुग्णालयात दाखल केले. बालरोग विभागाच्या ‘पीआयसीयू’मध्ये डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. तिच्या प्रत्येक जखमेवर रेबीज प्रतिबंधात्मक ‘एआरएस’ आणि ‘एआरव्ही’ लस देण्यात आली. त्यासोबत सलाइन, अँटिबायोटिक आणि इतर आवश्यक उपचार देत डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर करण्याचा प्रयत्न केला.
या उपचारांमध्ये अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे आणि बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट इंचार्ज डॉ. उबेदउर रहमान, डॉ. अनिकेत सरवदे, डॉ. श्रीकांत जोशी, डॉ. केशव दुधाडे, डॉ. योगेश राऊत, डॉ. प्रशांत राठोड, डॉ. गौरव पांडे, डॉ. केदार राजमाने, डॉ. सिमरा खान, डॉ. छबी यांच्यासह इन्चार्ज सिस्टर उषा पवार आणि परिचारिका हमीदा शेख यांनी विशेष मेहनत घेतली.
सततच्या उपचारांमुळे आयशाच्या जखमा हळूहळू भरू लागल्या आणि तिची प्रकृती सुधारू लागली. तब्बल 11 दिवसांच्या उपचारानंतर डॉक्टरांनी मंगळवारी तिला रुग्णालयातून सुट्टी दिली. पुढील काळात लसीकरण आणि नियमित तपासणीसाठी बालरोग बाह्यरुग्ण विभागात येण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याची माहिती बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे यांनी दिली.
आयशा घरी परतल्याचा क्षण कुटुंबीयांसाठी अत्यंत भावनिक ठरला. “घाटीमध्ये माझ्या नातीला नवजीवन मिळाले. त्यामुळे आम्ही तिला नवीन कपडे घालून घरी घेऊन आलो. ती आता आनंदात आहे,” असे आयशाची आजी नसीम सय्यद मुख्तार यांनी सांगितले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांच्या तक्रारीनंतर घराजवळ फिरणारे आठ मोकाट कुत्रे पकडण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
भीषण हल्ल्यातून वाचलेल्या आयशाच्या चेहऱ्यावर पुन्हा उमटलेले हसू हे घाटी रुग्णालयातील डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांचे जिवंत उदाहरण ठरले आहे. तिच्या प्रकृतीत झालेल्या सुधारामुळे कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनीही समाधान व्यक्त केले.






