वाडी महाळुंगी (ता. नांदुरा) येथील शेलकर कुटुंबावर अचानक कोसळलेल्या या संकटाने परिसरात शोककळा पसरली आहे. पती बसचालक, तर पत्नी वाहक म्हणून नोकरी करत कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलत होते. मात्र, अपघाताने कुटुंबाचा कणा असलेला आधारच हिरावून घेतला.
अमोल सुरेश शेलकर (वय 38) यांचा आठ वर्षांपूर्वी घाटपुरी येथील साबळे कुटुंबातील रिना यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर काही काळ ते वाडी महाळुंगी येथे वास्तव्यास होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते घाटपुरी येथील गजानन कॉलनीत सासरकडे राहत होते. साबळे कुटुंबात अमोल हे लाडके जावई म्हणून ओळखले जात होते.
advertisement
जन्मत: आजार, साधं उभंही राहता येत नव्हतं, नव्या वर्षात ‘देवदूत’ भेटला, ‘तो’ थेट चालायला लागला
पती चालक, तर पत्नी वाहक
गेल्या तीन वर्षांपासून अमोल शेलकर हे ‘साई ट्रॅव्हल्स’ या खासगी बससेवेत चालक म्हणून कार्यरत होते. कष्टाळू, जबाबदार आणि मनमिळावू चालक अशी त्यांची ओळख होती. संसाराचा आर्थिक भार हलका करण्यासाठी त्यांच्या पत्नी रिना यांनीही एका कंपनीच्या एसटी बसवर वाहक म्हणून नोकरी स्वीकारली होती. पती-पत्नी दोघेही मेहनतीने संसार उभा करत होते.
मुलांचं पितृछत्र हरपलं
शेलकर दाम्पत्याला दोन अपत्ये आहेत. मुलगा इयत्ता आठवीत, तर मुलगी इयत्ता तिसरीत शिक्षण घेत आहे. मात्र, शुक्रवारी पहाटे घाटपुरीजवळ समृद्धी महामार्गावर खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात अमोल शेलकर यांचा जागीच मृत्यू झाला. अचानक आलेल्या या संकटामुळे पत्नी रिना आणि दोन चिमुकल्यांवर दुःखाचा आघात कोसळला असून, मुलांचे पितृछत्र हरपले आहे.
आईवडील शेतकरी
अमोल शेलकर यांचे आई-वडील वाडी महाळुंगी येथे शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांना तीन मुले असून अमोल हे मधले अपत्य होते. हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी मेहनतीने कुटुंबाला आधार दिला होता. मात्र, घरातील कर्ता पुरुष अचानक निघून गेल्याने संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. गावासह घाटपुरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेवटचं पाहताही आलं नाही
अपघातानंतर वाहनाला लागलेल्या आगीत अमोल शेलकर यांचे शरीर पूर्णतः भाजले गेले. त्यामुळे कुटुंबीयांना त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शनही घेता आले नाही. कामावर निघताना पाहिलेला चेहराच पत्नी आणि मुलांसाठी शेवटचा ठरला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे. अपघातामुळे अमोल शेलकर यांचे अचानक निधन झाल्याने पत्नी आणि मुलांना अखेरचा निरोपही देता आला नाही. वडिलांचे छत्र हरपल्याने मुले गहिवरून गेली असून, पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यू झालेल्या अमोल शेलकर यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी वाडी (ता. नांदुरा) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अपघातात जखमी झालेल्या 21 प्रवाशांना घाटी रुग्णालयात पहाटे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सर्व जखमींना प्राथमिक उपचार देऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही प्रवाशांना पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.






