छत्रपती संभाजीनगरमधील नगर नाक्यापासून वेरूळकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे 140 कोटी रुपयांचा हा चारपदरी रस्त्याचा प्रकल्प असून, महापालिकाही दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोड बांधणार आहे. या कामामुळे रस्त्याची रुंदी 60 मीटरपर्यंत वाढणार आहे. मात्र या विस्तारात रस्त्यालगतची अंदाजे 3 हजार झाडे अडथळा ठरत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. ही झाडे तोडण्याची परवानगी मागण्यात आली असून, त्यामुळे परिसरातील पर्यावरणीय समतोल धोक्यात येऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
advertisement
झाडे तोडण्याच्या निर्णयाला नागरिक आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांचे म्हणणे आहे की,“विकास महत्वाचा, पण निसर्गाची किंमत चुकवून नाही. सर्व झाडांचे शास्त्रीय पद्धतीने पुनर्रोपण करावे.”काही कार्यकर्ते तर या प्रकरणात न्यायालयात जाण्याच्याही तयारीत आहेत.
महापालिकेने यापूर्वी काही झाडांचे यशस्वी पुनर्रोपण केले होते.
भडकलगेट परिसरातील पिंपळाचे झाड स्वामी विवेकानंद उद्यानात हलवण्यात आले. पारिजातनगरातील कललेले झाड जवळच्या उद्यानात स्थलांतरित केले.या तिन्ही झाडांची वाढ सध्या चांगली होत असून, या अनुभवावर पडेगावातील झाडांचे संरक्षण करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पैठण रस्त्यावरील जलवाहिनी कामात शेकडो झाडे तोडण्यात आली होती. त्यातील 51 झाडांचे पुनर्रोपण करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तांत्रिक साधनांची कमतरता आणि अनुभवाअभावी तो प्रयोग अपयशी ठरला. इथल्या ‘ग्रीन बेल्ट’मधील २ हजारांहून अधिक झाडांवर त्याचा परिणाम झाला.सार्वजनिक बांधकाम विभागाने मनपाला पडेगाव रस्त्यातील झाडांच्या पुनर्रोपणासाठी किती खर्च येईल याबाबत पत्र पाठवले आहे. त्यावर मनपाच्या उद्यान विभागाने कोणती झाडे हलवता येतील आणि कोणती तोडावी लागतील याची मार्किंग करण्यास सुरुवात केली आहे.
विकास हा शहरासाठी आवश्यक असला, तरी त्यासाठी हिरवी छाया गमावणे ही मोठी किंमत आहे. पडेगावातील तीन हजार झाडांचे भविष्य आता प्रशासनाच्या निर्णयावर अवलंबून आहे. पर्यावरण आणि विकास यामधील समतोल राखत या झाडांचे संरक्षण होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
