समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये
नागपूर ते मुंबई जोडणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा तब्बल 701 किलोमीटर लांबीचा असून राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा प्रकल्प ठरला आहे. या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. सध्या हलक्या मोटार वाहनांसाठी या महामार्गावर 2.45 रुपये प्रति किलोमीटर टोल आकारला जातो. मात्र आता सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे ई-वाहनधारकांना या टोलचा बोजा उचलावा लागणार नाही.
advertisement
ई-वाहन प्रवासाला चालना
आजच्या घडीला राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही स्तरावर ई-वाहनांचा वापर वाढवण्यासाठी विविध सवलती दिल्या जात आहेत. प्रदूषण नियंत्रण, इंधन बचत आणि पर्यावरणपूरक वाहतुकीस प्रोत्साहन मिळावे, हा त्यामागचा उद्देश आहे. टोलमुक्त प्रवासाची सुविधा मिळाल्यास ई-वाहनांचा वापर करणाऱ्यांची संख्या आणखी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
फायद्यांचा लाभ कोणाला?
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे आणि अटल सेतू हे तिन्ही मार्ग राज्यातील सर्वात जास्त वापरले जाणारे रस्ते आहेत. हजारो वाहनांचा दररोज या मार्गावरून प्रवास होतो. त्यामुळे ई-वाहन धारकांना टोलमाफीमुळे आर्थिक बचत होईल. दुसरीकडे, सामान्य प्रवाशांमध्येही ई-वाहनांविषयी आकर्षण निर्माण होण्यास मदत होईल.
पर्यावरणासाठी महत्त्वाचे पाऊल
प्रदूषणाच्या वाढत्या समस्येमुळे ई-वाहनांचा वापर वाढवणे हे काळाची गरज ठरत आहे. टोल माफीमुळे प्रवासी ई-वाहन खरेदी करण्याचा विचार करतील आणि हळूहळू पारंपरिक इंधनावरील वाहनांपासून ई-वाहनांकडे वळतील. यामुळे केवळ पर्यावरण शुद्ध होणार नाही तर इंधन आयातीवरील अवलंबित्वही कमी होईल.
अंतिम निर्णय लवकरच
परिवहन विभागाची चाचपणी सध्या अंतिम टप्प्यात आहे. लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल आणि त्यानंतर ई-वाहनांना समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे आणि अटल सेतूवर टोल माफीचा लाभ मिळू लागेल. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा तर मिळेलच, पण भविष्यात हरित वाहतुकीस मोठे बळकटी मिळणार आहे.
प्रतिनिधी: अविनाश कानडजे (छत्रपती संभाजीनगर)