राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. सरकारने हाती घेतलेल्या शोधमोहिमेत तब्बल २६ लाख ३४ हजार बोगस लाभार्थी समोर आले असून, यामुळे दरमहा कोट्यवधी रुपयांचा निधी अपात्र महिलांना मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने संपूर्ण राज्यातील पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी पद्धतीने नव्याने पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
'दैनिक लोकसत्ता'ने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वाधिक अपात्र लाभार्थी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात (२ लाख ४ हजार) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात (१ लाख २५ हजार ३००) आढळले. त्याचप्रमाणे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहमदनगर जिल्ह्यात १ लाख २५ हजार ७५६, तर नाशिकमध्ये (छगन भुजबळ, दादा भुसे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ) १ लाख ८६ हजार ८०० अपात्र लाभार्थी असल्याचे समोर आले आहे.
इतर जिल्ह्यांमध्येही बोगस लाभार्थ्यांची मोठी संख्या नोंदली गेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये १ लाख ४ हजार ७००, कोल्हापूरमध्ये १ लाख १४००, मुंबई उपनगरात १ लाख १३ हजार, तर नागपूरमध्ये ९५ हजार ५०० अपात्र लाभार्थी आढळले आहेत. रायगड (६३ हजार), बीड (७१ हजार), लातूर (६९ हजार), सोलापूर (१ लाख ४ हजार), सांगली (९० हजार), सातारा (८६ हजार), नांदेड (९२ हजार) आणि जालना (७३ हजार) जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोणत्या जिल्ह्यात कमी बोगस लाभार्थी?
सर्वात कमी बोगस लाभार्थी गडचिरोली (१८ हजार), वर्धा (२१ हजार) आणि भंडारा व सिंधुदुर्ग (२२ हजार) जिल्ह्यांत नोंदले गेले आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. मात्र, या निकषाचा भंग करून अनेकांनी योजना हडप केली. त्यामुळे सरकारने आता प्राप्तिकर विभागाकडून आयकरदात्या महिलांची माहिती मागवली असून पडताळणी प्रक्रिया कडक करण्याचे संकेत दिले आहेत.