मुंबई : राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मोठ्या दिमाखात योजना सुरू केल्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत शिवसेनेत फूट पाडली. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात धडाकेबाज निर्णय घेत विविध योजना जाहीर केल्या. आता, याच योजनांना घरघर लागल्याचे चित्र आहे.
advertisement
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील योजना बंद करण्यात येणार आहे. शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या योजनेला यंदा घरघर लागल्याचे चित्र आहे. शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या उपक्रमावर प्रशासनाने लाल शेरा मारल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ही योजना थंडबस्त्यात गेल्याचे संकेत मिळत आहेत.
5 डिसेंबर 2023 रोजी एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू केली होती. राज्यातील शाळांचे आधुनिकीकरण, सौंदर्यीकरण आणि सर्वांगीण विकास हा तिचा उद्देश होता. दोन टप्प्यांत राज्यभर राबवलेल्या या उपक्रमात शाळांच्या विकासासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये लाखो रुपयांची पारितोषिके वाटण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये या योजनेची मोठी चर्चा झाली होती.
मात्र, यंदा ऑक्टोबर महिना सुरू झाला असतानाही या योजनेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परिणामी, शिक्षण क्षेत्रासह राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाली आहे. शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील ‘आनंदाचा शिधा’ ही योजना आधीच थांबलेली असताना, ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ही त्या यादीत गेली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेले “शीतयुद्ध” या योजनांच्या गतीवर परिणाम करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच काही योजनांबाबत असे निर्णय होत असल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेला प्राधान्य देत असल्याने इतर योजनांवर त्याचा परिणाम होत असल्याचे म्हटले जात आहे.