एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्यानंतर त्यांना ठाण्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. जवळपास सगळेच नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंचे शिवबंधन तोडत एकनाथ शिंदेंना साथ दिली. एकसंध शिवसेना असतानादेखील ठाणे महापालिकेवर सेनेची सत्ता होती. ठाणे महापालिका काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्यासमोर आव्हान निर्माण करण्यासाठी भाजपने पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि राष्ट्रवादी मार्गे पक्षात आलेले गणेश नाईक यांना मैदानात उतरवले आहे. ठाण्यात गणेश नाईक यांनी जनता दरबार घेण्यास सुरुवात केली आहे. आता शिवसेना शिंदे गटाने त्याला प्रत्युत्तर देण्याची रणनीती आखली आहे.
advertisement
शिंदे गट देणार प्रत्युत्तर...
ठाण्यातील भाजपच्या जनता दरबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने नवी मुंबई, पालघरवर लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपच्या जनता दरबाराला शिवसेना शिंदे गट 'लोक दरबारा'तून उत्तर देणार आहे. त्यामुळे महायुतीत जनता दरबारावरून सुरू असलेला सेना-भाजप वाद चिघळणार असल्याची चिन्हे आहेत.
गणेश नाईक यांच्या ठाण्यामधील जनता दरबारानंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पालघर मध्ये लोकदरबार घेणार आहेत. पालघर मध्ये 9 एप्रिलला पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली लोकदरबार आयोजित करण्यात आला आहे. ठाण्यातील गणेश नाईक यांच्या जनता दरबार घेण्याच्या निर्णयानंतर सेना भाजपमध्ये आधीच वादाची ठिणगी पडली होती.
