दरम्यान, पहाटे 05:01 ते दुपारी 02:00 वाजेपर्यंत सुटणाऱ्या एक्सप्रेसचा, पहिला आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री 08:00 वाजेपर्यंत तयार केला जाणार आहे. तर, इतरत्र वेळेमध्ये सुटणाऱ्या एक्सप्रेसविषयी बोलायचे तर, दुपारी 02:01 ते रात्री 11:59 आणि मध्यरात्री 12:00 ते पहाटे 05:00 या वेळेत सुटणाऱ्या गाड्यांसाठी, पहिला आरक्षण चार्ट ट्रेन सुटण्याच्या 10 तास आधी तयार केला जाईल. पूर्वी, आरक्षण चार्ट फक्त चार तास आधी तयार केले जात होते, त्यामुळे ऐनवेळी प्रवाशांची मोठी गैरसोय आणि गोंधळ होत होता.
advertisement
"प्रवाशांच्या सोयीसाठी, चार्ट लवकर तयार केले जात आहे. जेणेकरून प्रवासी आपल्या प्रवासाचे नियोजन सहजपणे करू शकतील.", अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या संदर्भात सर्व विभागीय रेल्वे विभागांना आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना त्यांच्या प्रवासाची आणि आपल्या सीटची माहिती जाणून घेण्यासाठी शिवाय, दूरवरून प्रवास करणाऱ्यांची चिंता कमी करण्यासाठी, रेल्वेने पहिल्यांदाच चार्ट तयार करण्याच्या वेळेत बदल केला आहे.
पूर्वी कोणत्याही एक्सप्रेसचा चार तासापूर्वी आरक्षण चार्ट तयार केला जायचा. वेटींग लिस्ट किंवा आरएसीमध्ये असलेल्या प्रवाशांना अगदी शेवटच्या क्षणी कन्फर्म सीटची सूचना दिली जात होती. त्यामुळे प्रवाशांची ऐनवेळी धावपळ उडायची. प्रवाशांची धावपळ वाचवण्यासाठी यामध्ये आता रेल्वेने मोठा बदल केला आहे. प्रवासाच्या 10 तास आधीच तुम्हाला तिकीटाचे स्टेटस कळणार आहे. या नव्या नियमामुळे प्रवाशांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.
जुन्या पद्धतीमुळे प्रवाशांना, दूरच्या ठिकाणांहून स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांना मोठी गैरसोय होत होती. प्रवासी अनेकदा चार्ट तयार होण्यापूर्वीच स्टेशनवर पोहोचायचे आणि नंतर त्यांना कळायचे की त्यांची तिकिटे कन्फर्म झालेली नाहीत. यामुळे वेळ आणि पैसा वाया जात होताच, शिवाय प्रवासाबाबत गोंधळ आणि ताणही वाढत होता. चार्ट तयार करण्यात होणाऱ्या विलंबामुळे योग्य प्रवास नियोजनात अडथळा येत असल्याच्या प्रवाशांकडून रेल्वेला बऱ्याच काळापासून तक्रारी येत आहेत. त्यामुळे, चार्ट तयार करण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
