पैठण, चंद्रपूर, नालासोपारा आणि नाशिक राज्यातील ही चार ठिकाणं. पण यांच्यात एक समान धागा आहे, तो म्हणजे घोळ.
'पैठण शहरात 2698 मतदारांची दोनदा नोंदणी
सुरूवातीला पाहुया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणपासून. पैठण शहरात जवळपास सव्वीसशे मतदारांची नावं डबल आहेत. पैठणमधून इतर ठिकाणी स्थलांतरित झालेल्या मतदारांची ही नाव आहेत. इतरत्र स्थायिक झालेल्या मतदारांनी आधी असलेल्या मतदार यादीतील नावे वगळली नाहीत. त्यामुळे दुहेरी नावं असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.
advertisement
तर राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपनं मतचोरी आणि बनावट मतदानातून विजय मिळवल्याचा आरोप केला होता. तसंच महाराष्ट्रात 5 महिन्यात 40 लाख मतदार वाढल्याचा दावाही राहुल गांधींनी केला होता. आणि त्यानंतर राज्यात मतदार यादीतील घोळांची मालिकाच सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसैनिकांना मतदारयाद्या तपासण्याचे आदेश दिले आहेत.
एकाच घरात तब्बल 119 मतदार
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस गावात एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. एकाच घरात तब्बल 119 मतदारांची नोंद सापडलीय. छोट्याशा घरात 119 मतदारांची नोंदणी कशी होवू शकते, असा प्रश्न आता निर्माण झालाय. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मतदार यादीची तपासणी केल्यावर हा प्रकार उघड झाला. 119 मतदार बोगस तर नाहीत ना, अशी शंकाही उपस्थित झालीय.
राज्यात चांदा ते बांदा मतदार यादीतील घोळ पाहायला मिळत आहेत. नालासोपारा विधानसभा मतदारसंघात माता जीवदानी चाळ इथल्या सुषमा गुप्ता या महिलेचं मतदार यादीत तब्बल सहा वेळा नाव असल्याचा प्रकार समोर आलंय. एकाच पानावर सुषमा गुप्ता यांचं नाव सहा वेळा असल्याचं पाहायला मिळतं.
नाशिकमध्ये बोगस मतदार
नाशिकमध्ये तर बोगस व्होटर आयडीच आढळून आले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी योगेश गांगुर्डेंनी हा पर्दाफाश केला. एकाच नावाने 3 बनावट मतदान कार्ड पाहायला मिळत आहेत. सुनील रवींद्र वाजपेयी या मतदाराचे तीन वेगवेगळे कार्ड आहेत. पण वडिलांचं आडनाव मात्र चौधरी असं आहे. विवेक मुन्डले आणि योगेश काळुंगे ही नावं वेगळी आहेत, पण फोटो मात्र एकच आहे. विहंग परब याच्या वडिलांचं आडनाव वैद्य झालंय. आणि मिना कळमकर या महिला मतदाराच्या आयडीवर चक्क पुरूषाचा फोटा पाहायला मिळतोय.
एकंदरीतच राहुल गांधींनी 7 ऑगस्ट रोजी दिल्लीत पत्रकार परिषद घेत, महाराष्ट्र आणि कर्नाटकात मतचोरी झाल्याचे आरोप केले होते. त्यानंतर मतदार यादीतील घोळांची मालिकाच सुरू झालीय. घोळांची ही मालिका विरोधकांच्या आरोपांना बळ देणारी आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं या सर्व प्रकारावर खुलास करण्याची गरजे आहे.