जळगाव : आपली मातृभाषा मराठी जशी वळणा-वळणावर बदलते, तसं आपल्या राज्याच्या खाद्यसंस्कृतीतही वैविध्य आढळतं. वडापाव, भाकरी अन् ठेचा हे तर सर्वांच्याच आवडीचे पदार्थ. मात्र यासह महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे पदार्थ मोठ्या चवीनं खाल्ले जातात. खान्देशातील वरण बट्टी आणि वांग्याच्या भाजीचा बेत म्हणजे जणू तृप्तीचा ढेकर.
असं म्हणतात की, जळगावात वरण बट्टी आणि वांग्याची भाजी एकदा खाल्ली की, पुन्हा पुन्हा खावीशी वाटते. इथं अनेक घरांमध्ये दर आठवड्याला हा बेत असतो. शिवाय ठिकठिकाणी या पदार्थांची विक्री होते आणि मोठी मागणी मिळते.
advertisement
जळगावात 'खान्देशी वरण बट्टी' याठिकाणी तर कुरकुरीत बट्टी, हिरव्या मिरचीची चवदार वांग्याची घोटलेली भाजी आणि आंबट कढी असं परिपूर्ण जेवण जेवून ग्राहक अगदी समाधानी होतात. ग्राहक इथून पार्सलही घेऊन जातात. इथल्या वांग्याच्या भाजीत घरी बनवलेला खास मसाला वापरलेला असतो. तर, बट्टीसाठी चक्कीवर दळलेलं पीठ वापरतात. नागरिक दूरदूरहून खान्देशी वरण बट्टीतील जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येतात.
100 रुपयात 10 बट्टी, वरण, 1 प्लेट वांग्याची घोटलेली भाजी मिळते. या एका पार्सलमध्ये किमान दोघंजण पोटभर जेवतात. कढीसुद्धा केवळ 10 रुपयांना आणि वांग्याची भाजी 40 रुपयांना मिळते. खिशाला परवडणारं आणि चवीला उत्तम असं हे जेवण असल्यामुळे खवय्यांची खान्देशी वरण बट्टीला विशेष पसंती असते. दरम्यान, जळगावची वरण बट्टी केवळ जळगावकरच नाही, तर पुणे, नाशिक, धुळे आणि मुंबईकरही आवडीनं खातात.