जालना : छातीला चिटकवलेली नेमप्लेट, पोलीस शिपायासारखा रुबाबदार खाकी पेहराव, डोक्यावर पोलीस इन्स्पेक्टरसारखी रुबाबदार टोपी, कमरेला खोसलेला नकली पिस्तूल अन फुटाची खळगी भरण्यासाठी होत असलेली फरफट ही कहाणी आहे एकेकाळी राजवैभव प्राप्त असलेल्या बहुरूपी या लोककलावंताची. मोबाईल इंटरनेटची साधने स्वस्तात उपलब्ध झाल्याने मनोरंजनाचा हमखास पर्याय लोकांकडे उपलब्ध झालाय. त्यामुळे पारंपारिक लोककलांना हल्लीची पिढी किंमत देत नाही. त्यामुळेच दिवसभर भटकंती करूनही फारसं दान पदरात पडत नाही. त्यामुळे कुटुंबाचा आणि पर्यायाने संसाराचा गाडा कसा चालवावा या विवंचनेत बहुरूपी समाज आहे. अशाच पद्धतीने भटकंती करत करत दारोदारी लोककला सादर करून उपजीविका करणाऱ्या लोककलावंताशी लोकल 18 च्या प्रतिनिधीने संवाद साधला पाहुयात.
advertisement
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील अरुण शेगर हा बहुरूपी समाजातील तरुण. भटकंती करत करत तो जालना जिल्ह्यातील दहिफळ या गावी लोककला सादर करून दान मागण्यासाठी आला. लग्नाला चला आता लग्नाला चला, असं म्हणत. विनोदी शैली आणि वाक्यरचनेने लोकांना खळखळून हसायला लावत त्यांच्याकडून पदरात पडेल ते दान तो घेत होता.
दीड हजार सदस्य, तब्बल 2000 किलो रांगोळी, सोलापुरात नंदीध्वज मिरवणूक मार्गावर रांगोळीच्या पायघड्या
सगळ्यांच्या हातात मनोरंजनाची साधने उपलब्ध झाल्याने लोक किंमत देत नाही पण सरकार दरबारी काही मागणी केल्यास सरकार दखल घेत नाही, अशी विवंचना अरुण शेगर व्यक्त करतो. बहुरूपी लोककला सादर करणारी कदाचित ही शेवटची पिढी ठरेल. यानंतर कुणीही या लोककलेचे सादरीकरण करणार नाही कारण लोक कलेला किंमत देत नाही आणि सरकार कलेला आश्रय देत नाही, अशी खंत तो व्यक्त करतो.
बहुरूपी कला सादर करण्याची ही परंपरा मागील पाचशे वर्षे जुनी आहे. माझं कोणत्याही शाळेत काहीही शिक्षण झालेलं नाही. त्यामुळे उपजीविकेसाठी ही कला सादर करतो. आमच्या बाप दादाच्या काळामध्ये बहुरूपी कलावंतांना आदर आणि सन्मान मिळायचा. गावामध्ये गेल्यानंतर अर्धा गाव पोलीस आले म्हणून घाबरायचा. आता खऱ्या पोलिसांनाही लोक घाबरत नाहीत.
छत्रपती शिवरायांच्या काळात देखील लोककलावंतांना राजाश्रय मिळायचा परंतु आता तसा राजाश्रय लोककलावंतांना मिळत नाही. लोककलावंतांच्या अनेक अडचणी आहेत मात्र शासन दरबारी त्याची दखल घेतली जात नाही. आजही आमच्या समाजातील अनेक कुटुंबे पालामध्ये उघड्यावर राहतात. त्यांना घरकुलाची सोय नाही. भटकंती करत असल्याने शिक्षण पूर्ण होत नाही. कला सादर करून पोट भरत नाही अशा असंख्य अडचणी समाजातील तरुणांपुढे असल्याचे अरुण शेगर यांनी सांगितलं.





