डोंबिवली : मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर नदीसारखे पाणी वाहू लागले आहे. कल्याण डोंबिवलीतही पावसाने एकच तारांबळ उडवून दिली आहे. डोंबिवली पूर्वीले असलेल्या एमआयडीसी परिसरातील घरे पाण्याखाली गेली आहेत. मुसळधार पावसाचा फायदा घेत डोंबिवली एमआयडीसी परिसरातील एका कंपनीने नाल्यात गुलाबी रंगाचे रासायनिक पाणी सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे परिसरातील नाले आणि गटारे तुडुंब भरले आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा घेत कंपनीने रासायनिक पाणी नाल्यात सोडले. त्यामुळे नाले गुलाबी रंगाने भरलेले दिसत आहेत. हे पाणी थेट उल्हास नदीत मिसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन जलजीवसृष्टी आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचे आरोप होत आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की, अशा कंपन्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. पर्यावरणप्रेमींनी यावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवत त्वरित तपास करून जबाबदार कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसरात यापूर्वीही अशा घटना घडल्या असून वारंवार होणाऱ्या या प्रकारांमुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत असल्याची चर्चा रंगली आहे.
2014 मध्ये डोंबिवलीत हिरवा पाऊस
2014 मध्ये डोंबिवलीत हिरवा पाऊस पडल्याने प्रदूषणाचा विषय चर्चेत आला होता. त्यानंतर प्रदुषणाचे प्रमाण कमी झाल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळासह सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालवणाऱ्यांकडून करण्यात आला. प्रत्यक्षात प्रदूषण कोठेही कमी झालेले नाही. रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते थेट नाल्यात सोडले जात असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.