कोल्हापूर : कोल्हापुरातील पंचगंगा नदी ही इशारा पातळीकडे सरकत असताना नदी शेजारी असणाऱ्या आंबेवाडी, प्रयाग चिखली अशा गावांमध्ये नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यातच 22 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पंचगंगेने इशारा पातळी गाठली. सध्या 39 फुटांवरून नदी वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमधील लोकांची स्थलांतरणाची तयारी सुरू झाली आहे.
advertisement
दरवर्षी, पुराचा फटका बसणारा कोल्हापुरातील परिसर म्हणजे आंबेवाडी, चिखली हा भाग आहे. त्यानुसार पावसाळ्यात दरवर्षी चिखली ग्रामस्थांचे नियोजन केले जात असते. ग्रामपंचायतकडून यंदाही संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन गावकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन केले आहे, अशी माहिती प्रयाग चिखली ग्रामपंचायतचे सरपंच रोहित पाटील यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात जोरदार पाऊस, जनजीवन ठप्प, तर प्रशासनाचे महत्त्वाचे आवाहन
दुपारी 4 वाजता पंचगंगेची पातळी वाढली -
कोल्हापूर शहर परिसरात सकाळपासून शहरात पावसाने उघडीप दिली असली तरी गेले काही दिवस पावसाचा तडाखा कायम आहे. त्यातच धरण क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. यामध्ये जिल्ह्यातील गगनबावडा, राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, भुदरगड, पन्हाळा या तालुक्यांमध्ये धो-धो पाऊस कोसळत आहे. त्यामुळेच पंचगंगेसह जिल्ह्यातील अनेक नद्या, लघु मध्यम प्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरुन ओसंडून वाहत आहेत. तर हळूहळू वाढणारी पंचगंगेची पाणी पातळी आता 22 जुलै रोजी दुपारी 4 वाजता 39 फूट 4 इंचावर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली असून राज्य, जिल्हा तसेच ग्रामीण मिळून 33 मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत जनजीवन विस्कळीत झाले आहेत.
प्रयाग चिखली ग्रामस्थांच्या स्थलांतराचे असे आहे नियोजन -
2019 आणि 2021 साली कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांसह प्रयाग चिखली गावालाही महापुराचा फटका बसला होता. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून घरोघरी जाऊन नागरिकांना आणि जनावरांना स्थलांतराच्या नोटिस देण्यात आल्या आहेत. गावातील 912 कुटुंबांचे नियोजन ग्रामपंचायतीकडून गेले महिनाभरापासून केले जात आहे. गावातील फक्त 15 ग्रामस्थांची राहण्याची सोय नसल्याने त्यांची सोनतळी येथे सोय करण्यात आली आहे.
महाबळेश्वर तापोळा-रस्त्यावर दरड कोसळली, वाहतूक ठप्प, घटनास्थळाचे photos
तसेच आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय विभाग, पूरग्रस्तांना मेडिकल किट अशी सर्व तयारी ग्रामपंचायतकडून करण्यात आलेली आहे. गावातील ज्या नागरिकांच्या जनावरांची सोय नाही, अशां लोकांच्या जनावरांसाठी छावणीमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. आत्तापर्यंत गावातील 55 ते 60 टक्के लोकांचे स्थलांतर झाले आहे. अजून पूरपरिस्थिती वाढल्यास राहिलेल्या सर्वांचे स्थलांतर होईल, अशी माहिती सरपंच रोहित पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, कोल्हापुरातील राधानगरी धरण हे सध्या 80 टक्के भरले आहे. धरण 100 टक्के भरल्यानंतर स्वयंचलित दरवाजे उघडले जातात. जिल्ह्यातील वारणा धरण 72 टक्के तर कडवी धरण 95 टक्क्यांवर आहे. जांबरे, घटप्रभा, जंगमहट्टी, आंबेओहोळ ही धरणे भरेली आहेत. त्यातच कोल्हापूरला 23 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट आणि 24, 25 जुलै रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास पूरपरिस्थिती वाढू शकते. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.