मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला फक्त तीन दिवस उरले आहेत. सोमवारी निवडणुकीचा प्रचार संपणार आहे.दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपसोबत महायुतीत निवडणूक लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी म्हटलं की, आमचा पक्ष शरद पवार यांच्या विचारांना मानतो. त्यांची विचारधारा हीच पक्षाची विचारधारा आहे. अजित पवार यांच्या या विधानाचे आता उलट सुलट अर्थ काढले जात आहेत. पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही असं म्हटलंय. मला सध्या महायुतीला विजयी करण्यात मदत करायची असल्याचं ते म्हणाले.
advertisement
सीएनएन न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत पत्नी सुनेत्रा यांना मैदानात उतरवणं चूक होती. बारामतीच्या जनतेनं हे स्वीकारलं नाही आणि मी माझी चूक मान्य करतो. आता बारामतीच्या जनतेनं ठऱवलंय की लोकसभेत सुप्रियाताई आणि विधानसभेत मला पाठिंबा देणार.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेसंदर्भात अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. अजित पवार यांनी म्हटलं की, पक्ष आजही शरद पवार यांच्या विचारधारेनेच चालतो. आम्ही धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवतो.
मतदानाला अवघे तीन दिवस उरले असताना अजित पवार यांच्या या विधानामुळे खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटोंगे तो कटोंगे चा नारा दिला होता. तेव्हा अजित पवार यांनी या घोषणेचा विरोध केला होता. त्यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटलं होतं की, अजितदादांना योगींच्या घोषणेचा अर्थ समजला नाही. यातूनही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरबुरी असल्याच्या चर्चा होत आहेत.
दुसऱ्या बाजूला आरएससने विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कामगिरीसंदर्भात एक रिपोर्ट तयार केलाय. याबद्दल विचारताच अजित पवार म्हणाले की, मी माझ्या सहकारी पक्षांसोबत चर्चा करतो. मग इतर कोण काय म्हणतं त्याकडे मी लक्ष देत नाही. त्यांना जो रिपोर्ट द्यायचाय त्याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. भाजपमध्येही अनेक नेत्यांनी वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत. मग नितीन गडकरी असतील किंवा अशोक चव्हाण असतील.
