राज्यात विधानसभेच्या 288 जागांवर तब्बल 7 हजार 995 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. वेगवेगळ्या विचारधारेंचे पक्ष एकत्र आल्यामुळे इच्छुकांची संख्याही वाढली आहे, यातून महायुतीसह महाविकास आघाडीला बंडखोरीची लागण झाली.
भाजपच्या 15, शिवसेनेच्या 4, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 बंडखोर रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीतील काँग्रेसचे 12, ठाकरेंच्या पक्षाचे 5 तर शरद पवारांच्या एनसीपीच्या 11 जणांनी बंडखोरी केलीय, म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुतीचे मिळून 52 बंडखोर रिंगणात आहेत.
advertisement
काँग्रेसला मोठा दिलासा...
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची पश्चिम महाराष्ट्रात चांगलीच पकड आहे. महायुतीने मागील काही वर्षात या दोन्ही पक्षांच्या वर्चस्वाला धक्का दिला. आता, पश्चिम महाराष्ट्रात आपली पकड मजबूत करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरू होते. त्याला यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये 15 बंडखोर होते. चार दिवसात 11 बंडखोरांनी मनधरणी करण्यात यश आले आहे.काँग्रेसमधील पुण्याच्या कमल व्यवहारे, नाशिकच्या हेमलता पाटील, मुंबईचे मोहसीन हैदर यांची मनधरणी करण्यातही पक्षाला यश आल्याची माहिती आहे. या उमेदवारांमुळे होणारी मतविभागणी टाळली जाण्याची शक्यता आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रयत्न...
शिवसेना ठाकरे गटानेदेखील आपल्या बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अनिल परब यांनीदेखील बंडखोरांसोबत चर्चा केली. त्याशिवाय, खासदार संजय राऊत, अनिल देसाई यांच्याकडूनही प्रयत्न सुरू होते. मुंबईत वर्सोवा मतदारसंघात राजू पेडणेकर आणि दिंडोशी मतदारसंघात रुपेश कदम यांच्यासोबत पक्षाने चर्चा केली. ठाकरे गटाचे काही बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान, महायुतीकडून बंड शमवण्याचे प्रयत्न सुरू होते. भाजपकडून बहुतांशी ठिकाणी आपल्याच उमेदवाराच्या विरोधात असलेल्या बंडखोरांची समजूत काढण्यात यश आले आहे. महायुतीकडून किती बंडखोर माघार घेणार, हे आजच स्पष्ट होईल.
