आपल्या विरोधात कटकारस्थान रचले जात असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनातील खदखद बाहेर काढल्याची चर्चा रंगली आहे. तर, दुसरीकडे प्रताप सरनाईक यांच्या विरोधात भाजपने रविवारी नवी खेळी केल्याचे स्पष्ट झाले. प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा सरनाईक या ज्या प्रभागातून निवडून येतात. त्या शिवाईनगर पट्ट्यातील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांना भाजपने पक्षात प्रवेश दिला आहे. त्यामुळे या भागात भाजप आपला जोर लावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे बैरीशेट्टी यांचे पती भास्कर हे सरनाईक यांचे कडवे विरोधक मानले जातात.
advertisement
भाजपसोबत युतीचे पत्र लिहिले, त्याच सरनाईकांना धक्का
महाविकास आघाडीची साथ सोडून भाजपसोबत जावे असे पत्र प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला. एकनाथ शिंदे यांना ठाण्यात मोठी साथ मिळाली. मात्र, ठाण्यात बैरीशेट्टी पती-पत्नीने लोकसभा निवडणुकीच्या तोडांवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. उपवन, शिवाईनगर, वसंत विहार यांसारख्या भागांत बैरीशेट्टी दाम्पत्याचा मोठा प्रभाव आहे. बैरशेट्टी हे आपल्या आक्रमकतेसाठी ओळखले जातात. त्यांचे आणि सरनाईक यांच्यात राजकीय स्पर्धा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या जवळ असून बैरीशेट्टी यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. ठाकरे गटातील प्रवेशानंतर बैरशेट्टी यांनी आक्रमक होत सरनाईकांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र, विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर बैरीशेट्टी दाम्पत्यासमोर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला.
बैरीशेट्टींची अडचण भाजपला फायदेशीर...
राजकीय कोंडीत अडकलेल्या बैरीशेट्टी दाम्पत्याला भाजपने साद घातली. बैरीशेट्टी दाम्पत्याची अडचण हीच भाजपसाठी फायदेशीर ठरल्याची चर्चा आहे. शिवाईनगर, पवारनगर, वसंत विहार यांसारख्या पट्ट्यांत भाजपच्या कमळ चिन्हावर मतदान करणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने या भागात पुन्हा एकदा जुळवाजुळव सुरू केली असल्याचे चित्र आहे.
भाजपचे आमदार संजय केळकर आणि जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांनी पद्धतशीरपणे डावा टाकला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवाईनगर, वर्तकनगर, वसंत विहार यांसारख्या पट्टांत पक्षाला चांगला वाव आहे, असे केळकर यांचे पूर्वीपासून मत आहे. त्यामुळे बैरीशेट्टी यांच्या पक्ष प्रवेशासाठी वरिष्ठांना गळ घालण्यात आली. वरिष्ठांच्या मंजुरीनंतर त्यांचा पक्षप्रवेश झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाजप मंत्री, आमदारांचे जनता दरबार...
ठाण्यात फक्त कमळ अशी घोषणा करणारे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्यास सुरुवात केली आहे. ठाणे शहरच नाही तर प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेण्याची तयारी गणेश नाईक यांनी केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना स्वगृहीच भाजपने घेरलं आहे. आता, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ करण्यासाठी भाजपने प्रभाग स्तरावरील नेत्यांना आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली आहे.
