आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होण्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास मुंबईतील समीकरणांवर काही परिणाम होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे राज ठाकरे यांच्या मनसेची भूमिकाही निर्णायक राहण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या मनसेला आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून प्रयत्न सुरू होते, अशी माहिती समोर आली होती. मात्र, ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत.
advertisement
लोढांनी घेतली राज यांची भेट, चर्चांना उधाण
राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मंगलप्रभात लोढा यांनी राज यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
मुंबईतील कबुतरखान्याच्या मुद्यावर मंगलप्रभात लोढा यांनी ही भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लोढा यांनी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कबुतरखाना सुरू केला. त्यावेळी त्यांनी मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये एक कबुतरखाना सुरू करणार असल्याचे म्हटले. लोढा यांच्या या वक्तव्यावरून वाद पेटणार असल्याची चिन्हे आहेत.
कबुतरखान्याची मागणी जैन समुदायाकडून केली जात आहे. मंगलप्रभात लोढा हेदेखील या मागणीबाबत सकारात्मक आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती आहे. त्याशिवाय, मुंबईतील अनेक समस्यांबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, मुख्य मुद्दा हा कबुतरखान्याचा होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील कबुतरखान्याला विरोध दर्शवला होता. कबुतरखान्यापेक्षा इतर महत्त्वाचे मुद्दे असल्याचे भाष्य त्यांनी केले होते.