राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अजूनही लढा सुरू आहे. मराठा आरक्षण हा राज्यातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा आरक्षण संघर्ष समिती, सकल मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने राज्यभरात 50 पेक्षा अधिक मोर्चे काढण्यात आले. अंतरवाली सराटीत मराठा आरक्षण उपोषणावर झालेल्या आंदोलनावर लाठीचार्जनंतर आरक्षण आंदोलन पुन्हा एकदा पेटले. मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्त्वात मराठा आंदोलक एकवटले. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन झाले. पण त्यानंतरही फारसे यश मिळाले नाही. काही ठिकाणी कुणबी प्रमाणपत्रावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झाली.
advertisement
कोल्हापूरमध्ये आज होणाऱ्या परिषदेत मराठा समाज आरक्षणसंदर्भात प्रलंबित प्रश्न, पुढील भूमिका व दिशा ठरविण्यासाठी राज्यभरातील विविध 42 मराठा आरक्षण संघटनांचे पदाधिकारी, मराठा आरक्षण विषयावरील तज्ज्ञ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मात्र, मनोज जरांगे पाटील यांच्याशिवाय ही बैठक पार पडत असल्याने मराठा आरक्षणात फूट पडली की काय, अशी चर्चा रंगली आहे.
कोण राहणार उपस्थित?
या परिषदेत शिवसंग्राम संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. ज्योती विनायक मेटे, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक, मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष, सुभाषदादा जावळे-पाटील, राष्ट्रीय मराठा महासंघ मुंबईचे अध्यक्ष, दिलीपदादा जगताप, शिवसंग्राम स्वराजचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे, मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे, शंभुराजे युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुनील मोरे, संभाजी बि- गेडचे अध्यक्ष संतोष पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
